Tuesday, July 21, 2026

BMC : मुंबईकरांना पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे BMC चे आवाहन

BMC : मुंबईकरांना पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे BMC चे आवाहन

पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी, नागरिकांनी पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

MUMBAI : मुंबई महानगरास पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयाच्‍या पाणलोट क्षेत्रात मागील ३ ते ४ दिवसांमध्‍ये सातत्‍याने पावसाची नोंद झाली आहे. त्‍यामुळे मागील दोन दिवसांपासून नदीपात्रात गढूळ पाणी आले आहे. परिणामी, मुंबई महानगरातील पश्चिम उपनगरे व शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गढूळता कमी करण्यासाठी महानगरपालिका जल अभियंता विभागामार्फत जलशुद्धीकरण केंद्रामध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहेत.पाणी निर्जंतुकीकरणाकामी क्लोरीनचा देखील पुरेसा वापर केला जात आहे. तथापि, खबरदारीचा उपाय म्‍हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्‍यावे, अशी विनंती बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना सात जलस्त्रोतांद्वारे दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. या सातही जलाशयांच्‍या पाणलोट क्षेत्रात मागील ३ ते ४ दिवसांत जोरदार पाऊस कोसळत आहे. परिणामी, नदीपात्रातून येणाऱया पाण्याची गढूळता वाढल्‍याचे, असे निदर्शनास आले आहे.

मुंबई महानगरातील पश्चिम उपनगरे आणि शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेस प्राप्त झाल्या आहेत. पाण्‍यातील गढूळता कमी करण्याकरिता महानगरपालिकेच्‍या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहे. पाणी निर्जंतुकीकरणाकामी क्लोरीनचा देखील पुरेसा वापर केला जात आहे.

या बाबी लक्षात घेता, नागरिकांनी गढूळ पाणीपुरवठा झाल्यास घाबरून जाऊ नये. गढूळ पाणी प्राप्‍त झाल्‍यास खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >