Sunday, July 19, 2026

Desalinate Seawater : समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी जलबोगद्याच्या कामासाठी कंत्राटदाराची निवड

Desalinate Seawater : समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी जलबोगद्याच्या कामासाठी कंत्राटदाराची निवड

पंपिंग स्टेशनपासून ते कांदिवली महावीर नगरपर्यंत उभारणार जलबोगदा

मुंबई (सचिन धानजी) : मनोरी येथे समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी २०० द.ल.लि. (Manori) प्रतिदिन क्षमतेचा निः क्षारीकरण प्रकल्प बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या निःक्षारीकरण प्रकल्पामधील उत्पादित पाणी मनोरी येथील नव्याने बांधण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशनपासून महानगरपालिकेच्या अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये मिसळण्यासाठी मनोरी ते चारकोप महापालिका उदयान व पुढे कांदिवली महावीर नगर दरम्यान जलबोगद्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल दीड हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून याकरता अॅफकॉन्स ईन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात येत आहे. (Desalinate Seawater)

मुंबईकरांना सध्या ४१०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जात असून मुंबईकरांची मागणी मात्र ४६०० दशलक्ष लिटर एवढी आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यांतील तूट भरून काढण्यासाठी तसेच हवामान बदलामुळे पावसाच्या स्वरूपात व तीव्रतेत होणाऱ्या बदलांना तोंड देण्यासाठी व पावसाच्या पाण्यावरील अवलंबित्व कमी करण्याकरिता मुंबई महानगरपालिकेने, मनोरी येथे समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा निः क्षारीकरण प्रकल्प बांधण्याचे आणि भविष्यात ४०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पर्यंत क्षमता वाढविण्याच्या तरतुदीसह काम हाती घेतले आहे. (Desalinate Seawater)

प्रकल्पांतर्गत नव्याने बांधण्यात येणारा जलवाहिनी बोगदा तसेच पंपिंग स्टेशनचे बांधकाम ४०० दशलक्ष लिटर क्षमतेनुसार विकसित करण्यात येत आहे.महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पंपिंग स्टेशनमधील यांत्रिक व विद्युत यंत्रणेची तरतूद २०० दशलक्ष क्षमतेपुरती करण्यात आली आहे. परंतु जलप्रवाह विश्लेषण व स्मेक यांनी सादर केलेल्या इतर तपशीलास जल अभियंता खात्याची संमती घेण्यात आली आहे. त्यानुसार हाती घेण्यात येणारा जलबोगदा हा मनोरी ते चारकोप महापालिका उद्यान या दरम्यान ४.६३ कि.मी. व पुढे महापालिका उद्यान ते कांदिवली महावीर नगर पर्यंत २.५४५ कि.मी. असा एकूण ७.१७५ कि.मी. लांबीचा, २.५ मी. संपूर्ण व्यासाचा आहे. (BMC News)

या निःक्षारीकरण प्रकल्पाचा संकल्पन व बांधकाम कालावधी ४८ महिने इतका आहे. या प्रकल्पातून उत्पादित होणारे पाणी विद्यमान वितरण व्यवस्थेमध्ये वेळेत समाविष्ट करण्यासाठी हाती घेण्यात येणाऱ्या जलवाहिनी बोगद्याचे बांधकाम त्याच कालावधीत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. त्यानुषंगाने, या बोगदा प्रकल्पाचा कालावधी ४५ महिने प्रस्तावित करण्यात आला आहे. हा कालावधी साध्य करण्यासाठी बोगद्याचे उत्खनन व बांधकाम हे, दोन बोगदा खोदाई यंत्रे (टीबीएम) वापरून करण्यात येणार आहे. या बोगद्याच्या मार्ग रेषेवर मनोरी, चारकोप महापालिका उद्यान व कांदिवली महावीर नगर अशा तीन ठिकाणी खोदकाम करून अर्थात कूपके बांधून त्या दरम्यान जमिनीपासून सुमारे १०४ ते १२८ मीटर खोलीवर, या दोन खोदाई यंत्राच्या सहाय्याने बोगद्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. या साठी उभारण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशनवर १०० किलोवॅट क्षमतेची सौरऊर्जा निर्मिती प्रणाली बसवण्यात येणार आहे. जेणेकरून मोठ्याप्रमाणात विद्युत वापरात बचत होणार आहे आणि पर्यायाने महापालिकेच्या निधीचीही बचत होणार आहे.(BMC News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >