NCP : राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल नाराज नाहीत!- हसन मुश्रीफ

विलिनिकरण करायचे असल्यास चर्चा दिल्लीतच होतील


मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या आणि विलिनीकरण करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील होणार असल्याच्या चर्चा राजकीय सुरू असतानाच, दुसरीकडे पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे पार्थ आणि सुनेत्रा पवार यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पक्षात कोणतीही नाराजी नसून सर्व नेते राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, असा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात किंवा विलिनीकरणाबाबत कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास, आता मुंबईत नाही तर दिल्लीतच चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्षांतर्गत घडामोडींसह महायुतीतील विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. मुश्रीफ म्हणाले की, येत्या २२ जुलैपासून पक्षाचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मरणार्थ सेवा सप्ताह साजरा केला जाणार आहे. त्यानंतर २९ जुलै रोजी पार्थ पवार यांचा साखरपुडा असून, या कौटुंबिक सोहळ्यानंतरच राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक बोलावली जाईल. पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांना विश्वासात घेऊनच पुढील अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच, सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत असल्याने पक्षाचे तिन्ही प्रमुख नेते दिल्लीत असतील. त्यामुळे विलिनीकरणाबाबतच्या पुढील चर्चा तिथेच पार पडतील.



राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी घेतलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत मुश्रीफ म्हणाले की, इस्लामपूरमधील लोकनियुक्त नगराध्यक्ष अपात्रतेच्या स्थानिक विषयासाठी ही भेट झाली होती. कार्यकर्त्यांवर अन्याय झाला की नेता मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो, संपूर्ण शहराची निवडणूक पुन्हा घेण्यापेक्षा मार्ग काढण्यासाठी अशा भेटीगाठी होतात, यात काही गैर नाही, असे सांगत त्यांनी या भेटीमागील राजकीय चर्चा फेटाळून लावल्या.



अर्थखाते राष्ट्रवादीला कधी मिळणार?


अर्थखात्याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, या संदर्भात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून, त्यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर या विषयावर पुन्हा अंतिम चर्चा होऊन तोडगा काढला जाईल. भाजप हा शब्द पाळणारा पक्ष असून सुरुवातीला ठरल्याप्रमाणेच निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



भ्रष्टाचाराचे आरोप करणे सोपे


सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विभागावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे मुश्रीफ यांनी खंडन केले. आरोप करणे सोपे असते, मात्र ते पुराव्यानिशी सिद्ध करणे अवघड असते. जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी असे बेताल आरोप केले जात असल्याचे ते म्हणाले. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाचे दरवाजे अद्याप न उघडल्याने निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या शक्यतेवर बोलताना, भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन दोन्ही राज्यांकडून पाण्याचे नियोजन सुरू असावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच २०-२१ जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडू न देता जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून बियाण्यांची व्यवस्था केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Comments
Add Comment

FIFA WORLDCUP 2026 : परदेशी पर्यटकांच्या नजरेतून 'अस्सल' अमेरिका; वृत्तमाध्यमांच्या प्रतिमेपलीकडचा अनुभव!

फिफा विश्वचषक २०२६ साठी जगभरातून आलेले पर्यटक केवळ फुटबॉलचा आनंद घेण्यासाठीच आले नाहीत, तर त्यांनी

Pune Sucide News : पुणे हादरलं ! १७ वर्षीय मुलीने  उचलले टोकाचे पाऊल थेट पाचव्या मजल्यावरुन....

पुणे : राज्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली

Ashok Kharat : अशोक खरातचा पाय खोलात ! ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र; रिमोटचा साप अन् ...

Ashok Kharat: नाशिक काय तर संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत नव्याने वाढ झाली आहे. धर्माच्या

Dattatray Bharne : बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची तक्रार आल्यास अधिकारी येणार बांधावर

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे; तक्रारींचे सात दिवसांत निराकरण बंधनकारक मुंबई : शेतकऱ्यांकडून बोगस बियाणे किंवा

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग, म्युरल्स उभारण्याच्या डॉ. प्रवीण गेडाम यांच्या सूचना

Nashik Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व परिसरातील विविध नदीघाटांवर सुरू असलेल्या

Vikram-1 Launch : भारताच्या अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! 'विक्रम-1' या पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा : भारताच्या अवकाश (Space) क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. हैदराबादस्थित स्कायरूट एअरोस्पेस (Skyroot