कृषी मंत्री दत्तात्रय भरणे; तक्रारींचे सात दिवसांत निराकरण बंधनकारक
मुंबई : शेतकऱ्यांकडून बोगस बियाणे किंवा खतांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील सात दिवसांच्या आत कृषी अधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तपासणी करतील आणि आपला अहवाल अंतिम करतील, अशी घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी शनिवारी केली. यासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना करण्यात आली असून तसा शासननिर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे.
खरीप हंगामात बियाण्यांच्या उगवण क्षमतेसह खते आणि कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असतात. या तक्रारींचे तातडीने आणि प्रभावीपणे निराकरण व्हावे, यासाठी शासनाने तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची सुधारित रचना लागू केली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र आणि महाबीज यांचा प्रतिनिधी, तसेच संबंधित कृषी अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि वस्तुनिष्ठ तपासणी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास मदत होईल, असे कृषी मंत्री म्हणाले. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि विक्रेत्यांना तपासणीवेळी प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडील खरेदी पावत्यांची पडताळणी करून विहित नमुन्यात पंचनामा केला जाईल आणि संबंधित बियाण्यांच्या लॉटचे नमुने अधिसूचित प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या १०० पेक्षा अधिक झाल्यास तिथे अतिरिक्त तक्रार निवारण समित्या गठित करण्याचे अधिकार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
श्रीहरिकोटा : भारताच्या अवकाश (Space) क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. हैदराबादस्थित स्कायरूट एअरोस्पेस (Skyroot Aerospace) या खासगी कंपनीने भारतातील पहिले ...
ॲग्री हॅकेथॉनला राज्यस्तरीय कायमस्वरूपी योजना म्हणून मान्यता
राज्यातील शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांच्या विकासाला अधिक चालना मिळण्यासाठी राज्य शासनाने 'ॲग्री हॅकेथॉन'ला आता राज्यस्तरीय कायमस्वरूपी योजना म्हणून मान्यता दिली आहे. राज्यातील नऊही कृषी-हवामान (Agro-climatic) विभागांना स्थानिक समस्यांवर त्यांच्या पातळीवर प्रभावी उपाययोजना विकसित करण्यास यामुळे मदत होईल. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विजेत्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलेल्या घोषणेनुसार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाने मुख्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दरवर्षी विजेत्याला २५ लाख आणि उपविजेत्याला १५ लाख रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात चक्राकार पद्धतीने या स्पर्धेचे आयोजन केले जाईल आणि निवड झालेल्या तंत्रज्ञानाची खरीप हंगामात प्रत्यक्ष शेतात चाचणी घेतली जाईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात राज्यस्तरीय कृषी व पशुधन प्रदर्शन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ जुलै २०२६ रोजी कृषी महाविद्यालय, पुणे येथे भव्य राज्यस्तरीय कृषी व पशुधन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या प्रदर्शनाची सांगता होणार आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन व मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित राहणार आहेत. हे कृषी प्रदर्शन राज्यातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नवकल्पना आणि मूल्यवर्धित शेतीचा प्रभावी मेळावा ठरेल. यात राज्यभरातील शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ), कृषी उद्योजक, संशोधक आणि कृषी विद्यापीठांचा सहभाग असणार असून, यशस्वी शेतकरी व शास्त्रज्ञांच्या सहभागातून विविध विषयांवर चर्चासत्रे घडवून आणली जातील. तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या घटकांचा गौरवही या महोत्सवात केला जाईल, अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली.