Wednesday, July 15, 2026

Devendra Fadnavis : छत्रपती संभाजीनगरकरांचा पाणीप्रश्न मिटणार

Devendra Fadnavis : छत्रपती संभाजीनगरकरांचा पाणीप्रश्न मिटणार

जायकवाडी पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई (Mumbai): छत्रपती संभाजीनगर शहराला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जायकवाडी धरणावरून सुरू असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर आणि विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. शहरातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करणे हे शासनाचे कर्तव्य असून, कामातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी संबंधित कंत्राटदार आणि यंत्रणांना सुनावले.(Devendra Fadnavis)

'वर्षा’ निवासस्थानी छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता, जलवाहिनीच्या कामासाठी खोदलेले रस्ते तातडीने पूर्ववत करून खड्डे बुजवावेत, जेणेकरून शहरात अपघात होणार नाहीत, अशी तंबीही त्यांनी यावेळी दिली. या बैठकीला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, माजी खासदार डॉ. भागवत कराड उपस्थित होते, तर इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला.

बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पाणी योजनेच्या संथ गतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी विशिष्ट टप्पे पाडून घ्यावेत आणि पाण्याच्या टाक्यांची बांधकामे तसेच शहरातील अंतर्गत पाणी वितरण वाहिन्यांचे काम तातडीने पूर्णत्वास न्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. अर्धवट कामांमुळे शहरवासीयांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करता येत नसल्याने, संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कंत्राटदारासोबत स्वतंत्र बैठक घ्यावी आणि कामाचा नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कंत्राटदाराने कामाच्या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ वाढवावे आणि पुढील बैठकीत टप्पेनिहाय आराखड्याचे सादरीकरण करावे, असे सांगतानाच, पाणी वितरण प्रणालीचे ‘हायड्रोलिक टेस्टिंग’ तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जुन्या पाणी वितरण वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम गतीने करून खोदलेले रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

नवी पाणीपुरवठा योजना काय?

- छत्रपती संभाजीनगर शहराच्या सन २०५२ मधील संभाव्य लोकसंख्येचा विचार करून जायकवाडी प्रकल्पावरून तब्बल ६०४ एमएलडी (दशलक्ष लीटर दररोज) क्षमतेची ही योजना आखण्यात आली आहे. या पाणी वितरणासाठी शहरात एकूण ५९ पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार असून, त्यापैकी २९ टाक्यांचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. - तसेच शहरात एकूण १ हजार ९११ किलोमीटर लांबीची वितरण वाहिनी टाकण्यात येणार असून, त्यापैकी १,२९१ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे आणि आतापर्यंत एकूण ४६ हजार ५०० नवीन अधिकृत नळ जोडण्या ग्राहकांना देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा