जयंत पाटील; मुख्यमंत्री-पटेल-तटकरे भेटीवर स्पष्टीकरण, अर्थमंत्री पदावरही भाष्य
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी मंगळवारी रात्री घडलेल्या नाट्यमय घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. "माझा आणि प्रफुल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्या भेटीचा काडीचाही संबंध नाही. आम्ही सर्व जण पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी पूर्णपणे एकसंघ आहोत," असे त्यांनी सांगितले.
१४ जुलैच्या मध्यरात्री ‘वर्षा’ बंगल्यावर प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची एकत्र भेट घेतली आणि त्यापूर्वी या तिन्ही नेत्यांची स्वतंत्र गुप्त बैठक झाली, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली होती. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी या भेटीमागचे खरे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, "माझ्या इस्लामपूर (ईश्वरपूर) नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्यात आले आहे. २००२-०३ सालापासून त्यांच्याकडे अतिक्रमणाची कोणतीही नोटीस नसताना राजकीय आकसापोटी ही कारवाई करण्यात आली. हा विषय नगरविकास खात्याशी संबंधित असल्याने मी सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा फोन बंद होता आणि ते दिल्लीला गेल्याचे समजले. त्यामुळे मी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागितली होती. त्यांनी वेळ दिली, मात्र बैठकीला उशीर झाला. मी तिथे हॉलमध्ये बराच वेळ वाट पाहत बसलो होतो. त्यानंतर मुख्यमंत्री आले, त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले आणि मी या प्रकरणात लक्ष घालतो, असे आश्वासन दिले. आमची केवळ ५ ते १० मिनिटेच चर्चा झाली. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत कोणतीही संयुक्त बैठक झाली नसल्याचे आणि विलीनीकरणाच्या सर्व चर्चा केवळ अफवा आहेत", असेही त्यांनी स्पष्ट केले.
Nashik : नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाकडून कारवाईचा धडाका सुरूच असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारण्यास पुन्हा ...
अर्थमंत्रिपद मिळणार?
या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जयंत पाटील महायुती सरकारमध्ये सामील होणार असून त्यांना राज्याचे अर्थमंत्रिपद दिले जाणार आहे, अशा चर्चांना उधाण आले होते. यावर जयंत पाटील म्हणाले, "मी स्वतः कशाचाच विचार केलेला नाही, मग तुम्ही माझ्यापेक्षा पुढे जाऊन खात्यांचे वाटप का करत आहात? खातेवाटप करणे हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा कायदेशीर अधिकार असतो आणि तो अधिकार तुम्ही त्यांच्याकडून हिरावून घेत आहात. तुम्ही खूपच पुढचा विचार करत आहात. आम्ही सर्व जण शरद पवार साहेबांच्या पाठीशी एकसंघ उभे आहोत. मात्र, प्रसारमाध्यमांतून वारंवार अशा खोट्या चर्चा समोर आणल्या जातात, याचे मला मनापासून दुःख होते."
विनोद तावडे भेटीवर स्पष्टीकरण
तसेच, भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत बोलताना ते म्हणाले की, संसदेच्या एका समितीच्या बैठकीदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत मीही तिथे उपस्थित होतो. एका सार्वजनिक कार्यक्रमात विनोद तावडे तिथे आल्यामुळे आम्ही एकत्रित कॉफी घेतली, यात कोणताही राजकीय हेतू नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Shrirampur : आकाश दुबैय्या हत्या प्रकरणानंतर श्रीरामपूरमधील (Shrirampur) राजकीय वातावरण अधिकच तापले असून आरोप-प्रत्यारोपांना नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रीय श्रीराम ...
डी-लिमिटेशन'वर सुप्रिया सुळेच धोरण ठरवणार
लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत (डी-लिमिटेशन) आणि 'वन नेशन, वन इलेक्शन' या प्रस्तावित विधेयकांवर पक्षाची भूमिका काय असेल, यावरही त्यांनी भाष्य केले. जयंत पाटील म्हणाले, "संसदेमध्ये आमचे आठ खासदार एकत्र असून सुप्रिया सुळे त्यांचे खंबीर नेतृत्व करत आहेत. डी-लिमिटेशन बिल आणि 'वन नेशन' बिलाच्या मुद्द्यांवर पक्षाचे धोरण ठरवण्याची संपूर्ण जबाबदारी आमच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. महिलांच्या आरक्षणावर आणि हक्कांवर त्या नेहमीच संसदेत आग्रही राहिल्या आहेत. हे बिल संसदेत येणार असून मी सध्या राज्य विधानसभेत आहे. त्यामुळे मी केंद्रीय पातळीवरील विषयांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. पक्षाची अधिकृत भूमिका आमच्या कार्याध्यक्षाच ठरवतील आणि त्यांच्या कायदेशीर अधिकारात मी ढवळाढवळ करणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.





