Saturday, September 19, 2026

BMC News : अंधेरीत साचलेल्या पाण्यात पोहायला गेलेल्या दहा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

BMC News : अंधेरीत साचलेल्या पाण्यात पोहायला गेलेल्या दहा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

- भूखंड महापालिकेचा, पण खड्डा खणल्यानंतरही संरक्षक पत्रे न बसवल्याने दुर्घटना घडल्याचा आरोप

मुंबई, (विशेष प्रतिनिधी) :

जुहू येथे महापालिकेच्या ताब्यात आलेल्या एका भूखंडामध्ये खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्यात मित्रांसमवेत पोहायला गेलेल्या दहा वर्षीय मुलांचा मृत्यू झाला. दिनेश बसवराज हरिजन असे या दुर्देवी मुलाचे नाव असून या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. (BMC News)

दहिसर (पूर्व), नॅशनल पार्क हद्दीतील केतकी पाडा येथे शनिवारी एका खदानीत साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पियुष गुप्ता (१९) आणि ओम अंकुश सिंग (१९) या दोन तरुणांचा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी अंधेरी पश्चिम येथे दहा वर्षी मुलगा खड्डावजा साचलेल्या पाण्यात पोहोण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. (BMC News)

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी दुपारी १.०० वाजताच्या सुमारास जुहू, वायरलेस कंपाऊंड, डी.एन. नगर, जागृत हनुमान मंदिरामागे अंधेरी (पश्चिम) येथे एका खासगी जागेतील तलावात दिनेश बसवराज हरिजन (१०) हा मुलगा त्याच्या २-३ मित्रासोबत पोहायला गेला होता. पण येथील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच त्याला पोहायला येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. त्याच्यापरीने शोध घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र तो न सापडल्याने अखेर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना मदतीसाठी वर्दी देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या तलाव सदृश्य साचलेल्या भागातील पाण्याचाकसून शोध घेतला. त्यानंतर काही तासांनी या बुडालेल्या दिनेश हरिजन याचा शोध लागला. त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (BMC News)

जुहू येथील या वसाहतीचा महापालिकेच्या आश्रय योजनेतंर्गत विकास करण्यात येणार होता. परंतु याठिकाणी आधीच एसआरए योजना मंजूर झाली होती. त्यामुळे येथील हा भूखंड वादग्रस्त असून येथील काही बांधकामे तोडून टाकल्यानंतर बांधकामाच्या दृष्टीने याठिकाणी खड्डा तयार करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा खड्डा करताना त्याठिकाणी संरक्षक पत्रे लावून हा परिसर बंदिस्त करणे आवश्यक होते. पण महापालिका प्रशासनाने याबाबतची कोणतीही कार्यवाही न केल्याचे बोलले जात आहे. (BMC News)

महापालिकेचा हलगर्जीपणा कारणीभूत :

महापालिकेने हा भूखंड ताब्यात घेतांना संबंधित जागा मालकाकडून त्या ठिकाणी खदाण सदृश्य भागात संरक्षण कुंपण लावून घेणेबाबत अट घालण्यात आली होती. मात्र त्या अटींचे पालन झाले नाही. जर वेळीच कुंपण बनवले असते तर आज ही घटना घडली नसती, असे सांगत माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे, या दुर्घटनेत मृत पावलेल्या मुलाच्या कुटुंबियांना पालिकेने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली. (BMC News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >