Devendra Fadnavis : तपास न करताच वडील आणि भावावर हत्येचा गुन्हा, बेपत्ता मुलगी परतल्यानंतर पोलिसांचे बिंग फुटले

बुलढाण्यातील घटनेची विधानसभेत चर्चा; जबाबदार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा


मुंबई : जळगाव जामोद (जि. बुलढाणा) पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला आणि शिरच्छेद केलेला मृतदेह सापडल्यानंतर, पोलिसांनी कोणताही ठोस तपास न करता तो मृतदेह बेपत्ता असलेल्या शिवानी कलमेकर नावाच्या युवतीचा असल्याचे गृहीत धरले. इतकेच नव्हे, तर तिच्या निष्पाप वडील व भावाला खुनाच्या खोट्या आरोपाखाली अटक करून न्यायालयासमोर हजर केले. मात्र, काही दिवसांनी ती बेपत्ता मुलगी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली आणि पोलिसांच्या अत्यंत बेजबाबदार कारभाराचे धिंडवडे निघाले. पोलिसांचा हा प्रताप मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात चांगलाच गाजला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी संबंधित पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांसह सर्व दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून, विहित प्रक्रिया पूर्ण करून त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ (निष्कासित) करण्याची तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मोठी घोषणा सभागृहात केली.(Devendra Fadnavis)



राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मे २०२६ मध्ये जळगाव जामोद येथे एका अज्ञात महिलेचा छिन्नविच्छिन्न मृतदेह सापडला होता. पोलिसांनी कोणतीही वैज्ञानिक चाचणी किंवा डीएनए पडताळणी पूर्ण न करताच, केवळ दाव्याच्या आधारावर संशयित म्हणून त्या मुलीच्या वडिलांना आणि भावाला अटक केली. या गरीब कुटुंबाला पोलिसांनी अतोनात शारीरिक व मानसिक त्रास (टॉर्चर) दिल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. चुकीची कारवाई करणाऱ्या अशा सर्व पोलिसांना बडतर्फ करून खात्यात कठोर संदेश द्यावा, मूळ मृतदेह कोणाचा आहे याचा तपास किती दिवसांत लागणार हे स्पष्ट करावे आणि पोलिसांनी केलेल्या छळामुळे पीडित ठरलेल्या या गरीब कुटुंबाला राज्य सरकारकडून ५ ते १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार का, असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले.(Devendra Fadnavis)



यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, रोहित पवार यांनी उपस्थित केलेला मुद्दा वस्तुस्थितीवर आधारित असून, पोलिसांनी या प्रकरणात अतिशय लाजीरवाण्या पद्धतीने काम केले आहे. कोणत्याही फॉरेन्सिक चाचण्यांचे निष्कर्ष हाती येण्यापूर्वीच केवळ अंदाज बांधून पोलिसांनी एका जिवंत मुलीच्या वडील आणि भावाला खुनी ठरवले, ही गंभीर चूक आहे. या प्रकरणात निलंबनावर न थांबता, विभागीय चौकशीची विहित प्रक्रिया पूर्ण करून दोषी अधिकाऱ्यांना सेवेतून कायमचे बडतर्फ केले जाईल आणि ही विभागीय चौकशी पुढील तीन महिन्यांत पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, पोलिसांच्या जुलमी कारवाईला बळी पडलेल्या त्या निष्पाप व गरीब कुटुंबाला राज्य सरकारच्या वतीने योग्य ती आर्थिक मदत दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.(Devendra Fadnavis)





शिरच्छेद केलेला मृतदेह नेमका कोणाचा?


दरम्यान, जळगाव जामोद येथे सापडलेला तो अर्धवट जळालेला आणि शिरच्छेद केलेला मृतदेह नेमका कोणाचा आहे, याचा आता नव्या तांत्रिक पद्धतीने तपास सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सध्या उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून, राज्यातील जवळपास १ हजार ६०० ते १ हजार ७०० बेपत्ता (Missing) महिलांच्या नोंदी तपासण्यात आल्या आहेत. या एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मृतदेहाचा चेहरा जुळवण्याचा प्रयत्न केला असता, आतापर्यंत सात बेपत्ता महिलांच्या चेहऱ्यांशी साम्य आढळले असून, मूळ खुनाचा छडा लावण्यासाठी पोलीस यंत्रणा आता योग्य दिशेने तपास करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितले.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे