Monday, July 6, 2026

Girish Mahajan : अतिवृष्टीमुळे घडलेल्या सर्व घटनांची चौकशी होणार, नागरिकांनी सतर्क राहावे : मंत्री गिरीष महाजन

Girish Mahajan : अतिवृष्टीमुळे घडलेल्या सर्व घटनांची चौकशी होणार, नागरिकांनी सतर्क राहावे : मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे नुकसान होणे अशा अनेक गंभीर घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्यातील अशा सर्व दुर्घटनांची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी आज विधान परिषदेत दिली. तसेच, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मंत्री महाजन (Girish Mahajan) यांनी पुढे बोलताना सांगितले की, अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे ही एक नैसर्गिक आपत्ती असली, तरी ज्या ठिकाणी बोगदे, रस्ते किंवा इतर विकासकामांच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, त्या सर्व प्रकरणांची चौकशी केली जाईल. सध्या राज्यभरात आणि विशेषतः मुंबई महानगरपालिका क्षेत्राकडून सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. धोकादायक ठरणाऱ्या झाडांची छाटणी करण्यासोबतच, संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सतर्क असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

राज्यात गेल्या काही दिवसांत विक्रमी पावसाची नोंद झाली असून, याचा सर्वांत मोठा फटका मुंबई, रायगड आणि संपूर्ण कोकण पट्ट्याला बसला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांत राज्यात विविध पावसाळी दुर्घटनांमध्ये १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यामध्ये मुंबईतील मानखुर्द येथील दुर्घटनेतील ६ मृतांचा समावेश असल्याची माहिती मंत्र्यांनी (Girish Mahajan) दिली. मानखुर्द येथील दुर्घटनेनंतर आपण स्वतः तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिmumbai स्थितीची पाहणी केल्याचे सांगत ते म्हणाले की, तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर होती. वर्षानुवर्षे धोकादायक अवस्थेत असलेल्या परिसरात नागरिक राहत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अनेकदा धोकादायक इमारती खाली करण्यासाठी नोटिसा देऊनही, पर्यायी निवासाचा प्रश्न असल्याने नागरिक स्थलांतर करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी आता प्रशासन आणि नागरिक या दोघांमध्येही परस्पर सहकार्य असणे अत्यंत गरजेचे आहे.

अतिवृष्टीची ही भीषण परिस्थिती पाहता, नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, तसेच खासगी कार्यालयांनी शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची (घरून काम करण्याची) सवलत द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे निर्णयही घेण्यात आले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या एकूण परिस्थितीबाबत उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळात सविस्तर निवेदन करतील, असेही महाजन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यातील अतिवृष्टीची गंभीर परिस्थिती आणि मंत्र्यांचे निवेदन लक्षात घेता, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी, सर्व नागरिकांनी सतर्क राहून शासनाला सहकार्य करावे असे आवाहन करत आजचे सभागृहाचे कामकाज स्थगित करत असल्याचे घोषित केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >