Wednesday, July 1, 2026

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून, तब्बल १४ गावांतील ३,१०० हून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत. अचानक आलेल्या पुराचा फटका शेती आणि पशुधनालाही मोठ्या प्रमाणावर बसला असून, अनेक वाहने वाहून गेली आहेत.

पूर आणि भूस्खलनामुळे तबिरिपो साकू, लोगलू, रोहे आणि कोयू यांसारख्या गावांचा बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. सुमारे ५०० कुटुंबे अडकून पडली असून, गावाला जोडणारा झुलता पूल वाहून गेल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा यंत्रणा, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ग्रामस्थांना आपली घरे सोडून शेतातील तात्पुरत्या झोपड्यांमध्ये आश्रय घेण्याची वेळ आली आहे.

जिल्हा प्रशासन, भारतीय सैन्य, भारत-तिबेट सीमा पोलीस, बीआरओ आणि स्थानिक पोलीस प्रशासनाकडून संयुक्तपणे बचावकार्य राबवले जात आहे. अडकलेल्या गावांपर्यंत अन्नधान्य आणि पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. रस्ते वाहतूक पूर्ववत करणे आणि तात्पुरते पूल उभारणे याला सध्या सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला असून, केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, बाधित कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना त्वरित नुकसानभरपाई आणि पुनर्वसन सुविधा देण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. ईशान्य भारताच्या इतर राज्यांतही आसाम, मेघालय, सिक्कीम आणि नागालँडमध्ये मान्सूनच्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून, प्रशासन सतर्क आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >