Tuesday, June 30, 2026

Atacama Desert : लाखो रुपयांचे नवेकोरे कपडे थेट वाळवंटात फेकले जातात; कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Atacama Desert : लाखो रुपयांचे नवेकोरे कपडे थेट वाळवंटात फेकले जातात; कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Atacama Desert : जगभरात एका बाजूला फॅशनचा ट्रेंड दिवसेंदिवस बदलत आहे, तर दुसऱ्या बाजूला करोडो लोकांना अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडेही मिळत नाहीत. या दोन्ही टोकाच्या वास्तवाचं सर्वात धक्कादायक उदाहरण म्हणजे दक्षिण अमेरिकेतील चिली देशातील अटाकामा वाळवंट (Atacama Desert) . जगातील सर्वाधिक कोरड्या वाळवंटांपैकी एक असलेल्या या ठिकाणाला आता 'ब्रँडेड कपड्यांची स्मशानभूमी' म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे.

ब्रँडेड कपड्यांची स्मशानभूमी

इथे हजारो नव्हे, तर लाखो नवेकोरे आणि महागडे ब्रँडेड कपडे अक्षरशः टाकाऊ कचऱ्यासारखे फेकले जातात. विशेष म्हणजे, यापैकी अनेक कपडे एकदाही वापरलेले नसतात. ग्राहकांपर्यंत पोहोचण्याआधीच हे कपडे थेट वाळवंटात टाकले जातात. त्यामुळे अटाकामा वाळवंट हे जगभरातील फास्ट फॅशन उद्योगाचं सर्वात मोठं प्रतीक बनलं आहे. दरवर्षी चिलीतील इकीके (Iquique) बंदरातून तब्बल ५९ हजार टन कपडे अटाकामा वाळवंटात आणले जातात. यातील जवळपास ८५ टक्के कपडे कधीच बाजारात विकले जात नाहीत. विविध देशांतून आयात झालेला किंवा विक्री न झालेला स्टॉक थेट या वाळवंटात टाकून दिला जातो. त्यामुळे वर्षानुवर्षे या ठिकाणी कपड्यांचे प्रचंड ढीग साचले आहेत.

अटाकामामधील तीव्र उष्णता, कोरडे हवामान आणि वाऱ्यामुळे या कपड्यांच्या ढिगांना अनेकदा आग लागते. परिणामी लाखो-कोट्यवधी रुपयांचे ब्रँडेड कपडे जळून खाक होतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विषारी धूर व रासायनिक प्रदूषण निर्माण होतं. एकीकडे जगात आजही कोटयवधी लोकांकडे पुरेसे कपडे नाहीत. आफ्रिका, दक्षिण आशिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील अनेक कुटुंबांना मुलांसाठी अन्न घ्यावं की कपडे किंवा शूज विकत घ्यावेत, असा प्रश्न पडतो.

नवीन कलेक्शनमुळे 'फास्ट फॅशन' उद्योग

यामागचं मुख्य कारण म्हणजे 'फास्ट फॅशन' उद्योग. आज अनेक मोठे ब्रँड प्रत्येक काही महिन्यांनी नवीन कलेक्शन बाजारात आणतात. ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी सतत बदलणारे ट्रेंड तयार केले जातात. त्यामुळे जुन्या स्टॉकची मागणी कमी होते. विक्री न झालेला माल साठवून ठेवण्यापेक्षा तो नष्ट करणं किंवा फेकून देणं अनेक कंपन्यांना अधिक स्वस्त पडतं. चिलीमध्ये मोठ्या प्रमाणावर मोकळी जमीन आणि तुलनेने कमी खर्च असल्याने हे वाळवंट अशा टाकाऊ कपड्यांचं प्रमुख केंद्र बनलं आहे.

या फेकल्या जाणाऱ्या कपड्यांचा पर्यावरणावरही गंभीर परिणाम होत आहे. बहुतेक कपडे सिंथेटिक फायबरपासून तयार केलेले असल्याने ते सहज नष्ट होत नाहीत. त्यातून बाहेर पडणारी रसायने जमिनीमध्ये मिसळतात आणि माती व भूजल प्रदूषित करतात. हवामान बदलाच्या संकटात ही समस्या आणखी गंभीर बनत असल्याचा इशारा पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे.

भारतातही फास्ट फॅशनचा बाजार

अटाकामा वाळवंटातील कपड्यांचे ढीग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरातून संताप व्यक्त करण्यात आला. अनेकांनी फॅशन उद्योगाच्या बेफिकिरीवर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी ग्राहकांनीही अनावश्यक खरेदी टाळण्याची गरज असल्याचं मत मांडलं. भारतामध्येही फास्ट फॅशनचा बाजार झपाट्याने विस्तारत आहे. ऑनलाइन शॉपिंग, स्वस्त ऑफर्स आणि सतत बदलणारे ट्रेंड यामुळे कपड्यांचा वापर आणि टाकाऊ कपड्यांचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी रिसायकलिंगला प्रोत्साहन, सेकंड-हँड कपड्यांच्या बाजाराला चालना, कपड्यांचा जबाबदारीने वापर आणि पर्यावरणाबाबत जनजागृती यावर भर देणं अत्यंत आवश्यक आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा