Friday, June 26, 2026

Gokul Gite : "निकालाच्या चार दिवस आधीच ठरलं होतं सगळं"; श्रीकांत शिंदेंसोबतच्या 'त्या' गुप्त भेटीचा गोकुळ गीतेंचा मोठा दावा

Gokul Gite :

Gokul Gite : विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council Election) नाशिकच्या जागेवर अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवणारे आमदार गोकुळ गीते (MLA Gokul Gite) यांनी निकालानंतर झालेल्या राजकीय घडामोडींवर मोठा खुलासा केला आहे. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी आपण खासदार श्रीकांत शिंदे यांची गुप्त भेट घेतली होती आणि निकालाच्या तब्बल चार दिवस आधीच शिंदेसेनेसोबत जाण्याचा निर्णय निश्चित झाला होता, असा दावा त्यांनी केला.

नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांचा पराभव करून गोकुळ गीते यांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे निकाल जाहीर होताच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदेसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागील पडद्यामागच्या घडामोडींचा आता त्यांनी उलगडा केला आहे.

१०० पेक्षा जास्त मतांनी जिंकलो तर मला स्वीकारा

गोकुळ गीते म्हणाले, मतदान संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी श्रीकांत शिंदे यांची गुप्त भेट घेतली. त्या भेटीत त्यांनी नाशिकची जागा आपण १०० हून अधिक मतांनी जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. "जर मी १०० पेक्षा कमी मतांनी विजयी झालो, तर पुढील सहा वर्षे अपक्ष आमदार म्हणून काम करेन. मात्र, १०० पेक्षा जास्त मतांनी जिंकलो, तर मला शिंदेसेनेत स्वीकारावे," अशी विनंती आपण श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली होती, असे गीते यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, निकालाच्या आदल्या दिवशी श्रीकांत शिंदे यांनी ही संपूर्ण माहिती एकनाथ शिंदे यांना दिली होती. निकालानंतर आपण त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनाही आनंद झाल्याचे गीते यांनी सांगितले.

महायुतीकडून उमेदवारी का मिळाली नाही ?

गीते यांनी यावेळी उमेदवारीच्या राजकारणावरही भाष्य केले. महायुतीमध्ये नाशिकची जागा शिंदेसेनेच्या वाट्याला आल्यानंतर आपण एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पक्षाकडून उमेदवारी देण्याची विनंती केली होती. मात्र, नरेंद्र दराडे यांना पक्षप्रवेशावेळी उमेदवारीचे आश्वासन दिले असल्याने शिंदेंनी आपला शब्द पाळला आणि त्यांनाच उमेदवारी दिली, असे गीते म्हणाले.

माघारीसाठी दबाव, तरीही कार्यकर्त्यांनी फिरवली बाजी

अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपल्यावर माघार घेण्यासाठी मंत्रीस्तरावरून मोठा दबाव आणण्यात आला होता, असा दावाही गीते यांनी केला. या दबावामुळे आपण प्रचार थांबवला होता. मात्र, कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि शेवटपर्यंत लढा कायम ठेवला.माझ्या कार्यकर्त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या मेहनतीमुळेच हा विजय शक्य झाला,असे सांगत गोकुळ गीते यांनी आपल्या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना दिले.

गोकुळ गीतेंच्या या खुलाशामुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीमागील राजकीय घडामोडींवर नव्याने चर्चा सुरू झाली असून, निकालापूर्वीच पडद्यामागे मोठी राजकीय रणनीती आखली गेल्याचा दावा आता चर्चेचा विषय ठरत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा