Friday, June 26, 2026

Ketan Agarwal Murder : एवढा मोठा कांड केला तरी पश्चात्ताप नाही ; त्यात लॉकअपमध्ये सियाने अशी काही मागणी केली की पोलीसही झाले थक्क

Ketan Agarwal Murder : एवढा मोठा कांड केला तरी पश्चात्ताप नाही ; त्यात लॉकअपमध्ये सियाने अशी काही मागणी केली की पोलीसही झाले थक्क

Ketan Agarwal Murder : लोहगड किल्ल्यावर पती केतन अग्रवाल (Ketan Agarwal) याला शेकडो फूट खोल दरीत ढकलून ठार मारल्याच्या आरोपामुळे सध्या चर्चेत असलेली सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी सध्या पोलीस कोठडीत आहेत. मात्र, या दुहेरी कटाच्या तपासादरम्यान समोर येत असलेल्या माहितीने सर्वांनाच धक्का बसत आहे. खुनासारख्या गंभीर गुन्ह्याचा आरोप असतानाही दोघांच्या वागण्यात पश्चात्तापाचा लवलेशही दिसत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यातच सियाने लॉकअपमध्ये केलेल्या एका मागणीने पोलीस कर्मचारीही अवाक् झाले.

सियाने लॉकअपमध्ये केली धक्कादायक मागणी

माहितीनुसार, न्यायालयाने सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Chaudhary) यांना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघांची स्वतंत्रपणे चौकशी सुरू असून त्यांना वेगवेगळ्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. तपासादरम्यान सियाच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती, चिंता किंवा खेद दिसून आला नसल्याचे सांगितले जात आहे. उलट तिने पोलिसांसमोर अशी मागणी केली की उपस्थित कर्मचारीही काही क्षण अवाक् झाले. लॉकअपमध्ये असतानाच सियाने पोलिसांकडे बिअर (Beer) देण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी तिची मागणी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत तिला समज दिल्यानंतर ती शांत झाल्याचे सांगितले जाते.

चौकशीदरम्यान सियाने बिअर आणि घरचे जेवण मिळावे, अशी मागणी केली. मात्र, तपास अधिकाऱ्यांच्या मते, तिच्या वागण्यात गुन्ह्याबद्दलचा कोणताही पश्चात्ताप किंवा अपराधीपणाची भावना दिसून आलेली नाही. त्यामुळे तपास यंत्रणाही तिच्या वर्तनाकडे विशेष लक्ष ठेवून आहेत.

प्रेमासाठी रचला कट ? आता एकमेकांवरच आरोप

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, ज्या प्रेमसंबंधांसाठी दोघांनी केतनला मार्गातून हटवल्याचा आरोप आहे, तेच दोघे आता एकमेकांवर दोषारोप करत आहेत. चौकशीत चेतन चौधरीने दावा केला की, मला सियासोबत पळून जायचे होते. मात्र, कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने तिने नकार दिला आणि केतनचा काटा काढण्याचा प्रस्ताव तिनेच मांडला.दुसरीकडे सिया गोयलने हा दावा फेटाळून लावत, केतनच्या हत्येचा संपूर्ण कट आणि नियोजन चेतननेच केले होते, असा आरोप केला आहे. त्यामुळे दोघेही स्वतःची भूमिका कमी दाखवत संपूर्ण जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचे तपासातून समोर येत आहे.

तपासात नवे खुलासे होण्याची शक्यता

या हत्येप्रकरणात पोलिसांकडून दोघांची कसून चौकशी सुरू असून, घटनास्थळावरील पुरावे, मोबाईल कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पुढे नेला जात आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केतन अग्रवाल हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, आरोपींच्या वर्तनामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता या प्रकरणात तपासातून नेमके कोणते सत्य समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >