लाखो शिधापत्रिकाधारकांना दिलासा; उद्यापासून स्वस्त धान्य दुकानांमधून पुन्हा वितरण सुरू
मुंबई, दि. २४ जून : राज्यातील (Maharashtra) लाखो शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने (Central Government) घेतला आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महाराष्ट्रातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरणाची मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप धान्य न मिळालेल्या लाखो लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यापूर्वी धान्य वितरणाची अंतिम मुदत १५ जून निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्या कालावधीत राज्यातील सुमारे ७५ टक्के लाभार्थ्यांपर्यंतच धान्य पोहोचले होते, तर जवळपास २५ टक्के लाभार्थी विविध कारणांमुळे धान्यापासून वंचित राहिले होते.
कॉर्पोरेट जिहादला लगाम, कायद्यात बदल होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला आमदारांच्या विशेष समितीची ...
कोणताही पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्राने धान्य वितरणासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ मंजूर केली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील लाखो लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, उद्यापासून स्वस्त धान्य दुकानांमधून पुन्हा वितरण प्रक्रिया सुरू होणार आहे.
मंत्री भुजबळ यांनी केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून महाराष्ट्रातील परिस्थितीची माहिती दिली होती. तसेच उर्वरित लाभार्थ्यांना धान्याचा लाभ मिळावा यासाठी वितरणाची मुदत वाढविण्याची विनंती केली होती.
मंत्री भुजबळ यांच्या या मागणीची दखल घेत केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी धान्य वितरणाची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दिलासा मिळणार असून उर्वरित सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची विधान परिषदेत घोषणा मुंबई : महाराष्ट्रातील बालमृत्यूचे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी राज्य सरकारने (State Government) एक अत्यंत ...
मुदतवाढीच्या निर्णयानंतर उद्यापासून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन नियमानुसार धान्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील एकही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून यापुढेही लाभार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.




