Tuesday, June 23, 2026

Bharat Gogawale : अखेर भरत गोगावले पालकमंत्र्यांचा 'कोट' अंगावर चढवणार

Bharat Gogawale : अखेर भरत गोगावले पालकमंत्र्यांचा 'कोट' अंगावर चढवणार

 रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनील तटकरे आणि गोगावलेंमध्ये बैठक

मुंबई : दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला रायगडच्या पालकमंत्री (Guardian Minister of Raigad) पदाचा तिढा अखेर सुटण्याची शक्यता आहे. या संदर्भात मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात प्रदीर्घ बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर, रायगडच्या पालकमंत्रीपदाची धुरा अखेर भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. "भरत गोगावलेंनी झेंडावंदनासाठी शिवलेला कोट अंगावर कधी चढवणार", अशी उपहासात्मक टीका विरोधी बाकांवरून नेहमी व्हायची, तिला यानिमित्ताने पूर्णविराम मिळणार आहे.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमधील घटकपक्ष विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार रस्सीखेच सुरू होती. आपल्या सर्वपक्षीय संबंधांचा वापर करून सुनील तटकरे यांनी कन्या आदिती तटकरेंसाठी या पदावर दावा सांगितला होता. तर दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांनी आणि नेत्यांनी भरत गोगावले यांच्याकडेच ही जबाबदारी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी लावून धरली होती. दोन्ही पक्षांचे नेते समझोत्यास तयार नसल्याने गेल्या दीड वर्षांपासून पालकमंत्री पदाचा निर्णय प्रलंबित होता.

विधान परिषदेच्या कोकण प्राधिकारी मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला अर्थात अनिकेत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना सोडण्याच्या मोबदल्यात शिवसेनेने रायगडच्या पालकमंत्री पदाची मागणी केली. तेव्हाच्या तडजोडीनुसार, ही अट मान्य करण्यात आली होती. त्यानुसार, अनिकेत तटकरेंच्या बिनविरोध विजयानंतर मंगळवारी (दि. २३ जून) शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने मुंबईत झालेल्या वरिष्ठ पातळीवरील बैठकीत या विषयावर सखोल चर्चा झाली आणि भरत गोगावलेंना पालकमंत्री करण्याचे ठरवण्यात आले. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

काय म्हणाले सुनील तटकरे?

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले, "रायगडच्या पालकमंत्रीपदाचा विषय आता फार काळ प्रलंबित न राहता लवकरच संपुष्टात येईल. आजच माझी या संदर्भात   सविस्तर चर्चा झालेली आहे. आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रित बसतील आणि या विषयाला अंतिम स्वरूप दिले जाईल. ज्यावेळी माझ्यासारखी व्यक्ती हा विषय संपला आहे असे जाहीरपणे बोलते, याचा अर्थ महायुतीचे तिन्ही पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे विचार करून यावर सामुच्चाराने अंतिम निर्णय घेत आहेत."

तिढा लवकरच सुटेल - एकनाथ शिंदे

या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रायगडच्या तिढ्याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनीही याला दुजोरा दिला. "रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा आता संपला असून त्याचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर होईल. सुनील तटकरे आणि भरत गोगावले या दोघांनी आपापसात सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केलेली आहे. मी स्वतः या संदर्भात मुख्यमंत्र्यांशीही बोललो आहे. त्यामुळे हा विषय आता पूर्णपणे सुटला असून लवकरच रायगडला नवा पालकमंत्री मिळेल," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा