मुंबई : बॉलीवूडमधील सर्वात वादग्रस्त आणि गाजलेल्या वादांपैकी एक असलेल्या कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि हृतिक रोशन (Hritik Roshan) यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून शांत असलेला हा वाद सोशल मीडियावरील एका नव्या ट्रेंडमुळे अचानक उफाळून आला आहे. या नव्या वादात कंगनाने थेट हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझाद हिचे नाव घेत हृतिकवर जोरदार टीका केली आहे.
'सॉरी हृतिक'...ट्रेंडने पेटवला वाद
काही दिवसांपूर्वी विद्यार्थी आंदोलनादरम्यान 'जनरेशन झेड' (Gen Z) बद्दल कंगनाने केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे ती सोशल मीडियावर तुफान ट्रोल झाली. नेटिझन्सनी तिच्याविरोधात मीम्सचा पाऊस पाडला. याच दरम्यान, सोशल मीडियावर अचानक #SorryHrithik हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. कंगनाच्या जुन्या आरोपांची आठवण करून देत अनेक युजर्सनी, "आम्ही हृतिकला विनाकारण चुकीचे समजलो, सर्वांनी त्याची माफी मागितली पाहिजे," अशा पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली.
हृतिक रोशनच्या कमेंटने आगीत घातले तेल
सोशल मीडियावरील या वाढत्या ट्रेंडवर हृतिक रोशनने केलेली एक कमेंट या नव्या वादाचे मुख्य कारण ठरली. एका इन्फ्लुएन्सरच्या पोस्टवर उत्तर देताना हृतिकने लिहिले, "केवळ एखाद्या व्यक्तीबद्दल (B) राग आहे म्हणून दुसऱ्या व्यक्तीची (A) बाजू घेणे, ही आपल्या समाजातील एका मोठ्या मानसिकतेचा भाग आहे. योग्य वेळ आणि योग्य संदर्भ मिळाल्यावरच तथ्यांवर आधारित चर्चा व्हावी, अशी माझी अपेक्षा आहे." हृतिकच्या या सावध पण स्पष्ट टिप्पणीमुळे नेटिझन्सचे लक्ष पुन्हा एकदा या जुन्या प्रकरणाकडे वेधले गेले.
मुंबई : मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई करत 16 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. या ...
कंगनाचा थेट सबा आझादचा उल्लेख करत टोला
हृतिकची ही कमेंट पाहताच कंगना रनौतचा पारा चढला आणि तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहून हृतिकवर थेट हल्लाबोल केला. कंगनाने लिहिले, "प्रिय हृतिक, तुला सबा आझादच्या रूपाने एक चांगली जोडीदार मिळाली आहे, याचा मला आनंद आहे. तुम्ही दोघे एकत्र खूप छान दिसता. जेव्हा तू एका गंभीर नात्यात असतोस, तेव्हा दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला अशा प्रकारे त्रास देणे किंवा तिची टवाळी करणे तुला शोभत नाही." तिने पुढे हृतिकला सल्ला देत लिहिले, "माझ्याविरोधात गैरवर्तन करणाऱ्या लोकांना खतपाणी घालण्याऐवजी किंवा आगीत तेल ओतण्याऐवजी तू त्यांचा निषेध करायला हवा होतास. स्वतःच्या पार्टनरला लाजिरवाणे वाटेल असे वागू नकोस. मला आशा आहे की तू समंजसपणा दाखवशील आणि अशा अनावश्यक टिप्पण्या करणे थांबवशील."
नेमका काय होता २०१६ मधील मूळ वाद ?
कंगना आणि हृतिक यांच्यातील वादाची सुरुवात २०१६ मध्ये झाली होती, जेव्हा कंगनाने एका मुलाखतीत हृतिकचा उल्लेख 'सिली एक्स' (Silly Ex) असा केला होता. त्यावर हृतिकने त्यांच्यात कोणतेही प्रेमसंबंध नसल्याचे स्पष्ट केले आणि कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले. प्रत्युत्तरादाखल कंगनानेही कायदेशीर नोटीस पाठवत हृतिकवर नाते लपवल्याचा आणि ईमेल हॅक केल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण पुढे पोलीस आणि सायबर सेलपर्यंत पोहोचले होते. मात्र, दीर्घ तपासानंतरही कंगनाने केलेल्या दाव्यांची पुष्टी करणारा कोणताही ठोस पुरावा पोलिसांना सापडला नव्हता.
वर्षांनंतर हृतिकला मिळतोय नेटिझन्सचा पाठिंबा
या संपूर्ण वादादरम्यान हृतिकला मोठ्या प्रमाणावर ट्रॉलिंग आणि वैयक्तिक टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, आता अनेक वर्षांनंतर सायबर तपासातील निष्कर्ष आणि बदललेल्या परिस्थितीमुळे सोशल मीडियावर लोक हृतिकची बाजू घेताना दिसत आहेत. 'सॉरी हृतिक' या ट्रेंडमुळे हा वाद पुन्हा एकदा बॉलिवूडच्या केंद्रस्थानी आला असून, पुढे यावर हृतिक किंवा सबा काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






