Monday, August 3, 2026

Taslima Nasreen : जंतर-मंतरवरील आंदोलनाची बांगलादेशातील घडामोडींशी तुलना; तस्लीमा नसरीन यांचे वक्तव्य

Taslima Nasreen : जंतर-मंतरवरील आंदोलनाची बांगलादेशातील घडामोडींशी तुलना; तस्लीमा नसरीन यांचे वक्तव्य

बांगलादेशातून हद्दपार झालेल्या लेखिका तस्लीमा नसरीन (Taslima Nasreen) यांनी जंतर-मंतर येथे झालेल्या सीजेपीच्या (CJP) आंदोलनावर प्रतिक्रिया देताना त्याची तुलना 2024 मध्ये बांगलादेशात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाशी केली आहे. कोलकाता (Kolkatta) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी बांगलादेशातील घडामोडींमधून धडा घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

तस्लीमा नसरीन या 19 वर्षांनंतर कोलकात्यात आल्या असून त्यांच्या स्वागत समारंभानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, सध्या भारतात सुरू असलेल्या काही घडामोडी बांगलादेशातील 2024 मधील परिस्थितीची आठवण करून देतात. त्यांच्या मते, त्या आंदोलनादरम्यान अनेकांची दिशाभूल झाली आणि त्याचे परिणाम देशासाठी सकारात्मक ठरले नाहीत.

बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. पुढे हे आंदोलन सरकारविरोधी बनले आणि अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला. त्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले.

तस्लीमा नसरीन यांनी दावा केला की, या राजकीय बदलानंतर बांगलादेशात अस्थिरता वाढली आणि हिंदूंसह इतर अल्पसंख्याक समुदायांवर हल्ल्यांच्या घटना समोर आल्या. त्यांच्या मते, शेख हसीना यांच्या कार्यकाळातही काही समस्या होत्या, मात्र अंतरिम सरकारच्या काळात अल्पसंख्याकांची परिस्थिती अधिक कठीण झाली.

यावेळी त्यांनी बांगलादेशातील शिक्षण व्यवस्थेवरही भाष्य केले. धार्मिक शिक्षण संस्थांऐवजी धर्मनिरपेक्ष शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, बांगलादेशात मुक्त विचार मांडणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >