Monday, June 22, 2026

Girish Mahajan On Gokul Gite Victory : गोकुळ गितेंच्या विजयाने महायुतीत खळबळ; ‘कोणी विश्वासघात केला, चौकशी होणार’ - गिरीश महाजन

Girish Mahajan On Gokul Gite Victory : गोकुळ गितेंच्या विजयाने महायुतीत खळबळ; ‘कोणी विश्वासघात केला, चौकशी होणार’ - गिरीश महाजन

Girish Mahajan On Gokul Gite Victory : नाशिक विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था (Nashik Vidhan Parishad Election) मतदारसंघाच्या निवडणुकीतील निकालानंतर महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade ) यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे महायुतीच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडल्याचे समोर आले असून, आता या पराभवावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

दरम्यान, पराभवानंतर नरेंद्र दराडे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करत गोकुळ गिते यांना अप्रत्यक्ष मदत केल्याचा दावा केला. या आरोपांनंतर गिरीश महाजन यांनी प्रथमच सविस्तर प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली असून, महायुतीची मते नेमकी कशी फुटली याची चौकशी केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.

‘निकाल धक्कादायक, पण सत्य बाहेर येईल’

पत्रकारांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले की, नाशिक विधान परिषद निवडणुकीचा निकाल त्यांच्यासाठीही धक्कादायक आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्रितपणे बैठक घेतली होती आणि शेवटच्या क्षणापर्यंत सर्वजण उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नशील होते. मात्र, अपेक्षित निकाल लागला नाही.

“आम्ही चार-पाच दिवस सातत्याने बैठका घेतल्या. शेवटच्या दिवसापर्यंत सर्व पदाधिकारी आणि नेते निवडणुकीच्या कामात सक्रिय होते. तरीही निकाल आमच्या विरोधात लागला. त्यामुळे महायुतीची मते कुठे आणि कशी फुटली, याचा सखोल आढावा घेतला जाईल. मी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून संपूर्ण परिस्थितीवर चर्चा करणार आहे. कोणी विश्वासघात केला का, याचाही शोध घेतला जाईल,” असे महाजन यांनी स्पष्ट केले.

‘पोटात एक आणि ओठात एक ठेवण्याची माझी सवय नाही’

नरेंद्र दराडे (Narendra Darade ) यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. “पोटात एक आणि ओठात एक ठेवण्याचा माझा स्वभाव नाही. मी जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. दराडे हे अनुभवी नेते आहेत, त्यांनी असे आरोप करू नयेत. आमच्या पक्षाची संस्कृतीही तशी नाही,” असे सांगत त्यांनी आरोप फेटाळून लावले.

महाजन पुढे म्हणाले की, महायुतीकडे जवळपास साडेचारशेहून अधिक मते असल्याचा अंदाज होता. अशा परिस्थितीत अधिकृत उमेदवाराला अवघी २४८ मते मिळणे हे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे मतांची गळती नेमकी कुठे झाली, याचा तपास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

‘जळगावमध्ये आम्हाला विक्रमी मते; विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे’

यावेळी महाजन यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. जळगावमधील निकालाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, राज्यात सर्वाधिक मते महायुतीला जळगाव जिल्ह्यात मिळाली आहेत. विरोधी पक्षाला अत्यल्प मते मिळाल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांनी इतरांवर टीका करण्याऐवजी स्वतःच्या अपयशाचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला लगावला.

विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांचे नाव न घेता महाजन म्हणाले, “ज्यांना स्वतःच्या जिल्ह्यात मोजकीच मते मिळाली, त्यांनी इतरांना यश कसे मिळाले याची चर्चा करण्यापेक्षा स्वतःच्या पराभवाचे कारण शोधले पाहिजे. आपले अपयश झाकण्यासाठी इतरांवर आरोप करणे योग्य नाही.”

नाशिकच्या निकालानंतर राजकीय समीकरणांवर चर्चा

नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गिते यांच्या विजयामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी, मतांची फूट आणि स्थानिक राजकीय समीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत. अधिकृत उमेदवाराचा पराभव आणि अपक्ष उमेदवाराचा विजय हा महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा