Saturday, June 20, 2026

Nashik Crime News : कल्याण ज्वेलर्सच्या नावाने ८७ लाखांची फसवणूक; संशयित ताब्यात

Nashik Crime News : कल्याण ज्वेलर्सच्या नावाने ८७ लाखांची फसवणूक; संशयित ताब्यात

Nashik Crime News : कमी किमतीत सोने आणि महागडे मोबाईल देण्याचे आमिष दाखवून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या नगरसुल येथील सुप्रसाद प्रमोद दीक्षित या संशयित महाठगाने येवला तालुक्यातील एका बड्या उद्योजक व कंत्राटदाराला तब्बल ८७ लाख रुपयांना गंडा घातल्याचे अधिकृत एफआयआर (FIR) मधून समोर आले आहे.

फसवणुकीचा आकडा आणखी मोठा ?

या प्रकरणी येवला तालुका पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित आरोपी सुप्रसाद दीक्षित याला पुणे येथून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील फसवणुकीची व्याप्ती ३० ते ३५ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी अनेक पीडित समोर येण्याची शक्यता असून, फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची चर्चा आहे.

नेमकं प्रकरण काय ?

एफआयआरमधील माहितीनुसार, बाळापूर (ता. येवला) येथील कंत्राटदार व उद्योजक अंकुश प्रकाश शिरसाठ (वय ४५) यांनी वैयक्तिक सोन्याची खरेदी करण्यासाठी संशयित आरोपी सुप्रसाद दीक्षित याच्याशी संपर्क साधला होता. दीक्षितने शिरसाठ यांचा विश्वास संपादन करत, "कल्याण ज्वेलर्समध्ये सध्या सोन्याच्या खरेदीवर मोठी ऑफर सुरू आहे," असे सांगितले. त्यानंतर त्याने सांगितलेल्या बँक खात्यांवर शिरसाठ यांनी व्यावसायिक कामासाठी घेतलेल्या कर्ज रकमेतून तसेच स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या क्रेडिट कार्डद्वारे एकूण ८७ लाख रुपये वर्ग केले.

अशा प्रकारे एकूण ८७ लाख रुपये देऊनही शिरसाठ यांना ना सोने मिळाले ना पैसे परत मिळाले. वारंवार पैशांची मागणी केल्यानंतर आरोपीने टाळाटाळ केली आणि दोन महिन्यांपासून संपर्काबाहेर गेला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिरसाठ यांनी येवला तालुका पोलिसांत तक्रार दाखल केली. येवला तालुका पोलीस ठाण्यात सुप्रसाद प्रमोद दीक्षित याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब विठ्ठल दिघे करत आहेत.

फसवणुकीचे जाळे महाराष्ट्रभर ?

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आणि पीडितांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संशयिताने नाशिक जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर आणि पुणे परिसरातील अनेक तरुणांना अर्ध्या किमतीत आयफोन तसेच सोने देण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील फसवणुकीचा आकडा ३० ते ३५ कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

या फसवणुकीला बळी पडलेल्या नागरिकांनी घाबरून न जाता पुढे यावे. संबंधितांनी बँक व्यवहारांचे पुरावे, ऑनलाइन ट्रान्झॅक्शनची माहिती आणि इतर कागदपत्रांसह येवला तालुका पोलीस ठाणे किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधून तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा