Saturday, June 20, 2026

Omraje Nimbalkar : शिवसेनेत जाण्याबाबत अद्याप निर्णय नाही!

Omraje Nimbalkar : शिवसेनेत जाण्याबाबत अद्याप निर्णय नाही!
पवनराजे हत्याप्रकरणाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांची सावध प्रतिक्रिया; खासदारांच्या बंडाबाबतचा 'सस्पेन्स' वाढला मुंबई : उबाठा गटाच्या ६ फुटीर खासदारांमध्ये नाव असलेले धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाच्या निकालानंतर धक्कादायक विधान केले आहे. "शिवसेनेत जाण्याबाबत मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मी माझ्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि मगच पुढील निर्णय घेईन. या खटल्याचा निकाल आणि माझ्या राजकीय निर्णयाचा कोणताही संबंध नाही; सध्या कलियुग सुरू आहे," असे ओमराजे यांनी सांगितले. त्यामुळे खासदारांच्या बंडाबाबत सस्पेन्स वाढला आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात शनिवारी विशेष न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याने खासदार ओमराजे निंबाळकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "मला वाटते न्यायव्यवस्थेचे यापेक्षा मोठे दुर्दैव असू शकत नाही. या खटल्याच्या निकालासाठी २० वर्षांचा मोठा कालावधी घेतला गेला, त्यानंतर असा निर्णय येत असेल तर हे दुर्दैवी आहे. कोर्टाने राजकीय वैमनस्य होते हे मान्य केले आहे, पण तरीही सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. हत्या झाली ही वस्तुस्थिती आहे, मग ही हत्या नक्की कोणी केली?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, विशेष न्यायालयाच्या निकालाविराधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) वरिष्ठ न्यायालयात अपील करणार आहे. या निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. या चर्चेनंतर अमित शाह यांनी सीबीआयला तातडीने वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत.
ओमराजेंना परत यायचे असेल तर उद्धव ठाकरे निर्णय घेतील - अनिल देसाई - ओमराजे निंबाळकर यांच्या या बदललेल्या भूमिकेवर उबाठा गटाचे खासदार अनिल देसाई यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "ज्या केसबद्दल ओमराजे यांचे पूर्ण लक्ष होते, तो त्यांच्या जीवनातील मोठ्या संघर्षाचा भाग होता. विरोधी पक्षाकडून त्यांना जे काही वादे किंवा प्रॉमिसेस केले गेले होते, त्यावर ते स्वार दिसत होते. त्यांना पूर्ण विश्वास होता, पण आज त्यांचा विश्वासघात झाला आहे. २० वर्षे ते याचा पाठपुरावा करत होते, मात्र अखेर त्यांच्या पदरी निराशा आली आहे." - देसाई पुढे म्हणाले की, ओमराजे यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीवर एक प्रकारे बहिष्कार टाकून पक्षशिस्तीचा भंग केला आहे. ते २० तारखेच्या निकालानंतर निर्णय घेऊ असे म्हणत होते. आता जर त्यांना आमच्यासोबत परत राहण्याचा विचार करायचा असेल, तर त्यांनी आधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलावे. ओमराजेंबाबत काय करायचे, याचा अंतिम निर्णय घेण्यास उद्धव ठाकरे पूर्णपणे सक्षम आहेत, असे देसाई यांनी सांगितले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा