Thursday, June 18, 2026

Water cut in Mumbai : जूनपर्यंत पाऊस न पडल्यास मुंबईकरांवर आणखी १० टक्के पाणीकपात

Water cut in Mumbai : जूनपर्यंत पाऊस न पडल्यास मुंबईकरांवर आणखी १० टक्के पाणीकपात

५ जुलैनंतर आढावा घेतल्यानंतर कपातीचा घेतला जाणार निर्णय

मुंबई (सचिन धानजी)

मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये पातळी घटत चालत असतानाच पावसाचा काही अद्यापही पत्ता नाही. त्यामुळे मुंबईकरांवर मागील १५ मे पासून १० टक्के पाणीकपात करण्यात आल्यानंतर बुधवारपासून कमर्शियल वापराच्या पाण्यावरही २० टक्के कपात जारी करण्यात आली आहे. मात्र, तलावातील पाण्याचा साठा कमी होत असल्याने येत्या जून (June) अखेरपर्यंत पावसाने हजेरी लावून तलावातील पातळीत वाढ न झाल्यास येत्या ५जुलै नंतर मुंबईकरांना आणखी पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे निवासी वापराच्या पाणीकपातमध्ये आणखी दहा टक्के वाढ होणार असूनही ही कपात २० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. (Water Cut)

मुंबई पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार एवढा दशलक्ष लिटर एवढ्या वर्षभराची पाण्याची गरज असून १७ जून २०२६ पर्यंत या धरणातील पाणी साठा १ लाख ४४ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा आहे. त्यामुळे पाणी साठा १०.०१ टक्के एवढाच आहे. तर मागील वर्षी या तारखेपर्यंत ९.७८ टक्के अर्थात १ लाख ४१ हजार ५१० दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा होता तर त्या आधी म्हणजे सन २०२४मध्ये याच तारखेला ५.३८ टक्के म्हणजे ७७ हजार ८५१ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा होता. त्यामुळे तलावातील पाणी साठा घटत चाललेला असतानाही पावसाचा काहीही नेम नाही. अल निनोमुळे पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता असून भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठ्यातील पाणी उचलले जाणार आहे.

यामुळे भातसातून १ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर आणि अप्पर वैतरणा धरणातून ९० हजार दशलक्ष लिटर पाण्याचा साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एकूण २ लाख ३७ हजार दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. हा पाण्याचा साठा २७ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा आहे.

या दृष्टीकोनातून मागील १५ मे रोजी १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.तसेच बुधवारी १७ जूनपासून कमर्शियल वापराच्या पाण्यामध्ये २० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे पाऊस लांबणीवर पडल्याने तलावातील पाणी साठा वाढेपर्यंत मुंबईकरांना योग्यप्रकारे पाणी मिळेल याचे नियोजन महापालिका प्रशासनाच्या जलअभियंता विभागामार्फत केले जात आहे.

मात्र, येत्या ३० जून पर्यंत पुरेसा पाऊस न पडल्यास मुंबईकरांवरील पाणीकपात आणखी काही टक्क्यांनी वाढवली जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या दहा टक्के कपातीच्या तुलनेत अजून दहा टक्के कपात वाढवली जाण्याची शक्यता असून येत्या ५ जुलैपर्यंत तलाव क्षेत्रातील पाणी साठा आढावा घेवून पुढील कपात वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. ही कपात १० टक्क्यांनी वाढवली जाणार असून येत्या ५ जुलैनंतर ही वाढ लागू होणे अपेक्षित आहेत. अर्थात ही कपात पाऊस लांबणीवर पडला तरच लागू केली जावू शकते,असेही बोलले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा