Nashik : नाशिकच्या धरणांतील जलसाठा चिंताजनक पातळीवर; शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा विचार

Nashik : नाशिक जिल्ह्यावर यंदा एल निनोचा (El Nino) प्रभाव स्पष्टपणे जाणवू लागला आहे. पावसाच्या लांबलेल्या प्रतीक्षेमुळे धरणांतील जलसाठा घटत चालला आहे. जून महिन्याचा पूर्वार्ध जवळपास कोरडाच गेल्याने जिल्ह्यातील पाणीस्थिती आता गंभीर बनली आहे. परिणामी प्रशासनाने उपलब्ध जलसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू केले असून नाशिक (Nashik) शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा पर्यायही विचाराधीन आहे.



२६ धरणांमध्ये अवघा २३.३८ टक्के


पाटबंधारे विभागाच्या (Irrigation Department) आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये सध्या अवघा १६ हजार ६७२ दशलक्ष घनफूट म्हणजेच २३.३८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी मे महिन्यापासूनच पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे उलट झाली आहे. पावसाचे आगमन लांबल्याने आणि उष्णतेच्या लाटेमुळे जलसाठ्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असून धरणे झपाट्याने रिकामी होत आहेत.



माणिकपुंज धरण कोरडे


जिल्ह्यातील माणिकपुंज धरण (Manikpunj Dam) पूर्णपणे कोरडे पडले आहे. तर भोजापूर, वाघाड, पुणेगाव, तिसगाव आणि भाम ही धरणे तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत. पुनद, वाकी आणि आळंदी धरणांमध्ये जेमतेम पाच ते सहा टक्के जलसाठा उरला असून ही परिस्थिती प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनली आहे.



गंगापूर धरणात ३३ टक्के जलसाठा


नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहातही समाधानकारक स्थिती नाही. गंगापूर धरणात सध्या १८९७ दशलक्ष घनफूट म्हणजे ३३ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. काश्यपी धरणात ३१ टक्के, गौतमी गोदावरी धरणात ७५ टक्के जलसाठा असला तरी इतर अनेक धरणांतील पाणीपातळी सातत्याने घसरत आहे.पालखेड धरण समूहातील करंजवण, ओझरखेड, दारणा, भावली, मुकणे आणि इतर धरणांतील जलसाठाही अपेक्षेपेक्षा कमी आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गिरणा धरणात सध्या ३० टक्के जलसाठा असून, भविष्यातील पावसावरच पुढील परिस्थिती अवलंबून राहणार आहे.


एल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने धरणांमधून शेतीसाठी पाणी सोडण्यावर निर्बंध घालत उपलब्ध जलसाठा ३१ ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, नाशिक महापालिकेनेही परिस्थितीचा गांभीर्याने विचार सुरू केला आहे. सध्याचा जलसाठा १३ ऑगस्टपर्यंत पुरेल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र शासनाच्या निर्देशानुसार ३१ ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा सुरू ठेवायचा असल्याने सुमारे १८ दिवसांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.



शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ?


हा तुटवडा भरून काढण्यासाठी शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा पर्याय प्रशासनाच्या विचाराधीन आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात येत असून तो लवकरच महापालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधींसमोर सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पावसाने आणखी काही दिवस दडी मारल्यास नाशिक जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले असून पुढील काही दिवस जिल्ह्याच्या जलव्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

Comments
Add Comment

FIFA World Cup 2026 : एर्लिंग हालांडचा दुहेरी धमाका; इराकवर 4-1 विजय मिळवत नॉर्वेची विजयी सुरुवात

Mumbai : फिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेने दमदार सुरुवात करत ग्रुप-I मधील पहिल्या सामन्यात इराकचा 4-1 असा पराभव केला. स्टार

Navnath Ban : ऑपरेशन टायगरमागे भाजपा, शिवसेना नव्हे तर उबाठातील अंतर्गत राजकारणच

भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी काढली संजय राऊत यांची खरडपट्टी Mumbai : 'ऑपरेशन टायगर'शी भाजपा आणि शिवसेनेचा

Nashik : सातपूरमध्ये बोगस लाचलुचपत अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, स्कॉर्पिओसह दोघांना अटक

Nashik : सातपूर औद्योगिक वसाहतीतील उद्योग भवन परिसरात स्वतःला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून

Nashik : पश्चिम नाशिकच्या वाहतुकीला नवी झेप; अशोक स्तंभ ते गंगापूर रोड विकासकामांना वेग

Nashik : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर आणि शहराच्या पायाभूत सुविधांना आधुनिक स्वरूप देण्याच्या

Indo-Pacific Command : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय; 'इंडो-पॅसिफिक कमांड'चे नाव बदलून केले ’पॅसिफिक कमांड’

अमेरिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आपल्या यूएस इंडो-पॅसिफिक कमांड (यूएसइंडोपाकॉम) चे नाव बदलून पुन्हा यूएस

Jalgaon : आरपीएफच्या सहाय्यक फौजदाराचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, अमळनेर रेल्वे स्थानकात खळबळ

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर रेल्वे स्थानकावर (Amalner Railway Station) सोमवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. रेल्वे