Sunday, June 14, 2026

BMC : नाना शंकरशेठ यांच्या स्मारक उभारणीची प्रतीक्षा संपली, महापालिका स्वनिधीतून उभारणार स्मारक

BMC : नाना शंकरशेठ यांच्या स्मारक उभारणीची प्रतीक्षा संपली, महापालिका स्वनिधीतून उभारणार स्मारक

बांधकामासाठी कंत्राटदाराची अखेर निवड

मुंबई (सचिन धानजी) : आधुनिक मुंबईचे शिल्पकार, शिक्षणप्रेमी आणि समाजसुधारक म्हणून ओळख असलेल्या नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेठ यांच्या स्मारक उभारणीबाबत विश्वस्तांचा वनवास अखेर संपुष्टात आला आहे. नानांची स्मृती जतन करण्यासाठी वडाळा येथे भव्य स्मारक आणि शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी भूखंड प्राप्त झाल्यानंतर याचे बांधकाम कुणी करावे यावरून सुरु असलेला पेच संपुष्टात आला आहे. याचे बांधकाम आता महापालिका स्वनिधीतूनच करून देणार असून यासाठी कंत्राटदाराची नेमणूकही करण्यात आली आहे.

एफ/उत्तर विभागातील भु.क्र. ३/३५७ (भाग), माटुंगा विभागाच्या हद्दीतील जागेवर हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. ही जागा सुधार व महापालिकेच्या मंजुरीने नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेठ प्रतिष्ठानला देण्यात आली असून येथे अत्याधुनिक शैक्षणिक इमारत, संशोधन केंद्र तसेच नाना शंकरसेठ यांच्या कार्याला उजाळा देणारे स्मारक उभारण्यात येणार आहे.

नाना शंकरशेठ यांच्या स्मारकासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्था, इतिहास अभ्यासक आणि मराठी संघटनांकडून मागणी होत होती. मुंबईच्या विकासात आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान लक्षात घेता राजधानीत त्यांच्या नावाला साजेसे स्मारक उभारावे, अशी भावना सातत्याने व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या स्तरावर विविध बैठका व प्रस्तावांनंतर हा प्रकल्प आकारास येत आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर तत्कालिन महानगरपालिका ७ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये स्मारक व शैक्षणिक इमारतीच्या उभारणीस मंजुरी दिली. या मंजुरीनंतर जागा हस्तांतरण, आराखडा तयार करणे आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. त्यानुसार महापालिकेने ३५ कोटी रुपये मंजूर केल्याने त्यांच्या निधीतून हे काम केले जाणार होते. या अनुषंगाने २१ नोव्हेंबर २०२५ रोजी महापालिकेच्यावतीने निविदा मागवण्यात आली. यामध्ये १७ विविध प्रकारची कामांचा समावेश असून या कामांसाठी प्रशासनाने सुमारे १२ कोटी रुपये अंदाजित किंमत निश्चित केली होती. यामध्ये उणे २१ टक्के दराने हिराणी एंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली आहे. ९.४४ कोटी रुपये आणि विविध करांसह १४.०४ कोटी रुपये यावर खर्च केले जाणार आहेत. बांधकाम प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यांनतर पुढील १८ महिन्यांमध्ये हे स्मारकाचे बांधकाम पूर्ण केले जाणे अपेक्षित आहे.

उबाठाच्या काळात याचा भूखंड दिल्यानंतर प्रतिष्ठानच्या विश्वतांना महापालिकेचे पायऱ्या झिजवाव्या लागल्या. पण त्यानंतरही उबाठाची सत्ता महापालिकेत असून त्यांना महापालिकेच्या निधीतून हे काम करण्याचा धाडसी निर्णय घेता आला नाही. त्यामुळे स्मारकाच्या बांधकामासाठी कंत्राटदार निवडीला भाजपच्या सत्ता काळात मंजुरी मिळणार असल्याने आता पुन्हा या स्मारकाच्या बांधकामांवरून श्रेयवादाची लढाई खेळली जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा