First Day of School : शाळेतील पहिल्या दिवसाच्या स्वागताचा उत्सव : ‘शाळा प्रवेशोत्सव’

ब्रिजकिशोर झंवर, विभागीय संपर्क अधिकारी

राज्यातील सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे तसेच शाळेच्या पहिल्या दिवसाचे उत्सवात रूपांतर करणे या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शालेय शिक्षणाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि संस्मरणीय क्षण असल्याने या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत आनंददायी वातावरणात केल्यास त्यांचा उत्साह द्विगुणित होईल आणि शैक्षणिक वर्षाची सुरूवात अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात होईल. यासाठी विदर्भातील शाळा वगळता उर्वरित महाराष्ट्रात यंदाचा ‘शाळा प्रवेशोत्सव’ 15 जून 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे.


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. या पार्श्वभूमीवर शाळा प्रवेशोत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण करणे, पालकांचा विश्वास दृढ करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबाबत सकारात्मक वातावरण तयार करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रवेशोत्सवासाठी व्यापक नियोजन केले असून राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी राज्यभरातील विविध शाळांना भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.


मागील वर्षी राबविण्यात आलेल्या शाळा प्रवेशोत्सवामुळे शाळांमधील पटसंख्येतील घट कमी होण्यास मदत झाली. काही जिल्ह्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत पटसंख्येत वाढही दिसून आली. या सकारात्मक परिणामांच्या आधारे यंदा अधिक व्यापक आणि परिणामकारक पद्धतीने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


शाळा प्रवेशोत्सवांतर्गत प्रत्येक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे. ‘पहिले पाऊल’ या संकल्पनेअंतर्गत इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा घेऊन त्याची प्रत पालकांना दिली जाणार आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वितरण करण्यात येणार असून शाळेचा पहिला दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जाणार आहे.


या उपक्रमात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची सक्रिय भूमिका निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्याने किमान एका शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करायचे असून संबंधित अधिकाऱ्यांनी शाळा वर्षभरासाठी ‘दत्तक शाळा’ म्हणून स्वीकारून तेथील शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घ्यायचा आहे. यामुळे शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.


शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी परिसरातील अंगणवाडी व बालवाडी केंद्रांना भेट देऊन प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची माहिती संकलित करावी, पालकांशी संवाद साधावा आणि शासकीय शाळांमधील विविध सुविधा, शिष्यवृत्ती, नाविन्यपूर्ण उपक्रम यांची माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. समाजमाध्यमे, ग्रामस्तरीय जनजागृती, दवंडी आणि पालकांच्या व्हॉट्सॲप गटांद्वारेही शाळा सुरू होण्याबाबत व्यापक प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे.

यंदाच्या प्रवेशोत्सवासाठी जिल्हास्तरावर विशेष नियंत्रण व्यवस्था उभारण्यात आली असून ‘शाळा प्रवेशोत्सव कक्ष’ स्थापन करून कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवले जाणार आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या शाळा भेटींची माहिती, छायाचित्रे आणि अहवाल ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदविले जाणार आहेत.


शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. शाळा प्रवेशोत्सव 2026 हा उपक्रम विद्यार्थ्यांचे शाळेशी नाते अधिक दृढ करण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण, वाढती उपस्थिती आणि सक्षम शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शासन, प्रशासन, शिक्षक, पालक आणि समाज यांच्या संयुक्त सहभागातून प्रत्येक बालक शिक्षणाच्या प्रवाहात यावे, हा या उपक्रमामागील मूलभूत हेतू असून त्याद्वारे ‘शिक्षणसमृद्ध महाराष्ट्र’ घडविण्याच्या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल टाकले जात आहे.

Comments
Add Comment

महिला सक्षमीकरणाचा मानबिंदू

वेध-सीमा पवार   भारतीय सशस्त्र दलात महिलांचे वाढते योगदान हे देशाच्या बदलत्या सामाजिक आणि व्यावसायिक

रोजच्या ताटात विष!

प्रासंगिक-विवेक कांबळे   माणसाच्या मूलभूत गरजांपैकी सर्वांत महत्त्वाच्या असलेल्या अन्नातच किती मोठ्या

बालपणाचा बदलता चेहरा

मागोवा-वैष्णवी भोगले   एखाद्या समाजाचे भविष्य काय असेल, याचा अंदाज त्या समाजातील मुलांच्या बालपणाकडे पाहून

वसईच्या ‘बशी’ला आता ‘देवा’कडूनच अपेक्षा!

निमित्त-गणेश पाटील   वसई-विरार शहराचा आकार बशीसारखा उंच-सखल असल्याने येथे दरवर्षी पावसाचे पाणी साचते,” हे

खाद्यसंस्कृतीचा जागतिक दस्तावेज

नोेंद- अनिता बागवे छायाचित्र म्हणजे केवळ दृश्य नोंद नाही; ती एक कथा असते, हे सिद्ध करणारी 'वर्ल्ड फूड फोटोग्राफी

महिला शेतकऱ्यांना न्याय

फोकस-संदीप खांडगेपाटील   राज्य सरकारमुळे महिला शेतकऱ्यांना आता खऱ्या अर्थांने न्याय मिळाला. शेतात राबणाऱ्या