Friday, June 12, 2026

Water Shortage : भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात पाणीपुरवठ्याचे नियोजन करा, अशी मागणी

Water Shortage : भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात पाणीपुरवठ्याचे नियोजन करा, अशी मागणी

स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांची मागणी

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात यंदाच्या मान्सून हंगामाच्या सुरुवातीला अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडत असल्याने भविष्यात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

महापौर रितू तावडे यांना पाठविलेल्या पत्रात शिंदे यांनी भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजाचा उल्लेख करत, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडत असल्याचे नमूद केले आहे. तसेच, अद्याप समाधानकारक पर्जन्यमानाची नोंद झालेली नसल्याने धरणांमधील पाणीसाठाही दिवसेंदिवस कमी होत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.

या पार्श्वभूमीवर आगामी काळात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेने पाणी वाटप व वापराचे प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भातील उपाययोजना तातडीने राबवून पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करावे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेता जलस्रोतांचे संवर्धन आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा काटेकोर वापर करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत, प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती प्रभाकर शिंदे यांनी महापौरांकडे केली आहे.

पावसाळ्यातील वाहतूक समस्यांवर तातडीने उपाययोजना

पावसाळ्यात मुंबईत उद्भवणाऱ्या वाहतूक समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.मुंबईकरांना पावसाळ्यात वाहतूक कोंडी आणि प्रवासातील अडचणींचा सामना कमी करावा लागावा, यासाठी प्रशासनाने तातडीने कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो आणि अनेक ठिकाणी कोंडी निर्माण होते. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांची पूर्वतयारी करून योग्य त्या उपाययोजना तातडीने उपलब्ध कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment