Saturday, June 13, 2026

India vs Ireland T20 Series : बेलफास्टमध्ये हिंसाचारामुळे खळबळ; भारत-आयर्लंड टी-२० मालिका रद्द होणार?

India vs Ireland T20 Series : बेलफास्टमध्ये हिंसाचारामुळे खळबळ; भारत-आयर्लंड टी-२० मालिका रद्द होणार?

अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार असून २६ आणि २८ जून रोजी बेलफास्ट येथे दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, मालिकेला सुरुवात होण्याआधीच बेलफास्टमधील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेमुळे या सामन्यांच्या आयोजनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. (India vs Ireland T20 Series)

बेलफास्टमध्ये हिंसाचार का भडकला?

काही दिवसांपूर्वी बेलफास्टमध्ये घडलेल्या चाकू हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर स्थलांतरित समुदायाविरोधात संताप उसळला आणि अनेक भागांत हिंसक निदर्शने सुरू झाली. आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांवर हल्ले तसेच सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (India vs Ireland T20 Series)

BCCI सतर्क; सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य : 

बेलफास्टमधील परिस्थिती पाहता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सतर्क झाले आहे. बीसीसीआयचे अधिकारी क्रिकेट आयर्लंडच्या सातत्याने संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची सुरक्षा हीच सर्वात मोठी प्राथमिकता असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर सामने बेलफास्टऐवजी दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा पर्यायही चर्चेत असल्याचे समजते. मात्र, यासंदर्भातील अंतिम निर्णय क्रिकेट आयर्लंडकडेच असणार आहे. (India vs Ireland T20 Series)

क्रिकेट आयर्लंडचा ४८ तासांचा महत्त्वाचा निर्णय :

क्रिकेट आयर्लंडनेही या घडामोडी गांभीर्याने घेतल्या आहेत. स्थानिक प्रशासन आणि प्रादेशिक क्रिकेट संघटनांशी सतत संपर्क ठेवण्यात येत असून 14 जूनपासून सुरू होणाऱ्या आयरिश सीनियर कप आणि नॅशनल कप स्पर्धांबाबत पुढील ४८ तासांत निर्णय घेतला जाणार आहे. खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि प्रेक्षकांची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले असून परिस्थितीचा सखोल आढावा घेतल्यानंतरच पुढील निर्णय जाहीर केला जाईल. (India vs Ireland T20 Series)

मालिका रद्द होणार का?

सध्या तरी भारत-आयर्लंड टी-२० मालिका रद्द करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, हिंसाचाराची परिस्थिती कायम राहिल्यास सामने दुसऱ्या शहरात हलवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अत्यंत गंभीर परिस्थितीत वेळापत्रकात बदल किंवा मालिका रद्द करण्याचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे बीसीसीआय आणि क्रिकेट आयर्लंड दोन्ही संघटना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पुढील काही दिवसांत वातावरण शांत झाल्यास नियोजित वेळापत्रकानुसारच भारत-आयर्लंड टी-२० मालिकेचा थरार रंगण्याची शक्यता आहे. (India vs Ireland T20 Series)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >