Saturday, June 13, 2026

Wari 2026: लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

Wari 2026: लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

मुंबई दि. १३ जून : पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी पुणे येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण आढावा बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत पांडुरंगाच्या वारीच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर वारी मार्गावरील पाणी, वीज, स्वच्छता, विसावा केंद्रे, आरोग्य सुविधा, मदत केंद्रे, दिशादर्शक फलक तसेच (NHAI) ची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी वारी-२०२६ च्या नियोजनाबाबत आढावा बैठक पुणे येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला पालखी सोहळा विश्वस्त, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते, मुक्काम स्थळं आणि विसावा स्थळांची दुरुस्ती, आवश्यकतेनुसार टँकर व्यवस्था, जर्मन हँगर, पाणीपुरवठा तसेच वैद्यकीय सुविधा, आरोग्य मनुष्यबळ, मेडिकल किट आणि NDRF-SDRF पथके सज्ज ठेवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

'स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी' हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्याबाबत त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा उपाय, वाहतूक व्यवस्थापन आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त याबाबतही आवश्यक त्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.

पालखी सोहळा विश्वस्त, दिंडी प्रमुख आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वयाने काम करून वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश यावेळी दिले. सदर बैठकीत प्राप्त झालेल्या सर्व सूचनांची नोंद घेऊन त्यानुसार आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >