Wednesday, June 10, 2026

Nashik : रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दोन ते तीन दिवसांत बैठक, मंत्री महाजन यांचे आश्वासन

Nashik : रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दोन ते तीन दिवसांत बैठक, मंत्री महाजन यांचे आश्वासन

Nashik News : रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर मुंबई नाका येथील छावा क्रांतिवीर सेनेच्या संपर्क कार्यालयात संस्थापक अध्यक्ष करण गायकर (Karan Gaikar) यांच्या उपस्थितीत बाधित गावांतील प्रमुख शेतकऱ्यांची बैठक झाली. बैठकीत कालच्या घटनाक्रमाचा आढावा घेऊन पुढील आंदोलनाच्या दिशेबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी गायकर यांनी मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून शेतकऱ्यांच्या तक्रारी व मागण्या मांडल्या. त्यावर महाजन यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि बाधित शेतकरी यांची दोन ते तीन दिवसांत अधिकृत बैठक आयोजित करण्यात येईल व चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. तब्येत ठीक नसल्याने आणि मुंबईतील महत्त्वाच्या बैठकीमुळे काल उपस्थित राहता आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी ऐकून घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेत न्याय्य तोडगा काढण्याचा शब्दही त्यांनी दिला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, काही वृत्तपत्रांमध्ये ‘रिंग रोडवरून दोन गावांत वाद’ अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. याबाबत स्पष्टीकरण देताना करण गायकर यांनी गवळवाडी आणि रिंग रोड बाधित शेतकऱ्यांमध्ये कोणताही वाद झालेला नसल्याचे सांगितले. संबंधित बैठकीत गवळवाडीतील कोणताही शेतकरी उपस्थित नव्हता. त्यामुळे संघर्ष झाल्याचे वृत्त वस्तुस्थितीला धरून नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद विविध अलाईनमेंटचे पर्याय समजावून सांगत असताना काही शेतकऱ्यांमध्ये तांत्रिक बाबींमुळे गैरसमज निर्माण झाला होता. मात्र संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर तो दूर झाला. हा दोन गावांमधील वाद नसून माहितीच्या अपुऱ्या आकलनातून निर्माण झालेला क्षणिक गैरसमज होता, असेही त्यांनी सांगितले.बैठकीला मुंगसारे, मातोरी, चांदशी, जलालपूर, गोवर्धन, पाथर्डी, गौळणे, पिंपळगाव खांब, वडनेर दुमाला, विहितगाव, माडसांगवी, विंचूर गवळी, मखमलाबाद, पिंपळगाव बहुला आणि महादेवपूर येथील प्रमुख शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी शासनाकडून पुढील दोन दिवसांत अधिकृत बैठकीचे निमंत्रण येण्याची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही प्रश्न मार्गी लागला नाही तर पुढील आंदोलनाबाबत सामूहिक निर्णय घेण्यात येणार आहे.रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी विकासाला विरोध नसल्याचे स्पष्ट करताना, विकासाच्या नावाखाली आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक नुकसान स्वीकारले जाणार नसल्याचे म्हटले आहे. शासनाने सर्वांना न्याय देणारा तोडगा काढावा. – करण पंढरीनाथ गायकर, संस्थापक अध्यक्ष, छावा क्रांतिवीर सेना

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >