Wednesday, June 10, 2026

CM Devendra Fadnavis : भूमिहीन शेतकऱ्याच्या पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड

CM Devendra Fadnavis : भूमिहीन शेतकऱ्याच्या पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड

वीज पडून बैल दगावल्याने ओढवले होते संकट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेने गायकवाड कुटुंबाला दिलासा

मुंबई : वीज पडून बैल दगावल्याने शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी आपल्या पत्नीलाच जोखडाला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील एका भूमिहीन शेतकऱ्याची व्यथा समोर आली आहे. या हदयद्रावक घटनेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी अवघ्या काही तासांत घेत, पीडित शेतकरी कुटुंबाला नवा बैल आणि दगावलेल्या बैलाची आर्थिक नुकसान भरपाई मिळवून दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या तातडीच्या हस्तक्षेपामुळे लातूरमधील त्या कष्टकरी माऊलीच्या खांद्यावरील जोखड उतरले असून, संपूर्ण कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील काशिनाथ गायकवाड हे भूमिहीन शेतकरी (Farmer) आहेत. त्यांच्याकडे असलेल्या एका बैलजोडीच्या मदतीने गायकवाड आणि त्यांच्या पत्नी हौसाबाई परिसरातील इतर शेतकऱ्यांची जमीन कसत असत. नांगरणी, पेरणी आणि वखरणी अशी मिळेल ती कामे करून मिळणाऱ्या मजुरीवरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, शुक्रवारी (५ जून) झालेल्या वादळी पावसात वीज पडून त्यांच्या जोडीतील एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ऐन खरिपाच्या तोंडावर उदरनिर्वाहाचे साधन हिरावल्याने आणि हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण करायची असल्याने, विवश होऊन काशिनाथ गायकवाड यांना दगावलेल्या बैलाच्या जागी पत्नी हौसाबाई यांना जुंपावे लागले होते.

या घटनेचे वृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाला तातडीने मदतीचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्याशी संपर्क साधून महसूल, कृषी आणि पशुसंवर्धन यंत्रणेला तातडीने पावले उचलण्यास सांगितले. त्यानुसार, शासकीय यंत्रणेने तत्परता दाखवत पशुसंवर्धन विभागामार्फत तातडीने एक सक्षम बैल उपलब्ध करून घेतला. जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड आणि तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी स्वतः गायकवाड यांच्या वस्तीवर जाऊन तो बैल त्यांच्या स्वाधीन केला.

बँक खात्यात आर्थिक मदत जमा

नैसर्गिक आपत्तीत जनावरांचा मृत्यू झाल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (एसडीआरएफ) मदत देण्याचा नियम आहे. यानुसार, महसूल विभागाने दगावलेल्या बैलाचा तातडीने पंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून शासकीय आर्थिक साहाय्य मंजूर केले. ही रक्कमेची मदत थेट काशिनाथ गायकवाड यांच्या बँक खात्यात (Bank Account) (डीबीटीद्वारे) (DBT) जमा करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

हौसाबाईंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

शासनाकडून मिळालेल्या या अनपेक्षित आणि जलद मदतीनंतर हौसाबाई गायकवाड आणि त्यांचा मुलगा पुंडलिक यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. "बैल दगावल्याने आमच्यावर दुर्दैवी वेळ आली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आमच्या अडचणीची लगेच दखल घेतल्याने आता खरिपाच्या हंगामातील कामे पूर्ण करण्याची चिंता मिटली आहे," अशा शब्दांत हौसाबाई यांनी मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >