Wednesday, June 10, 2026

एआय आणि सायबर गुन्हेगारी

एआय आणि सायबर गुन्हेगारी

डॉ. दीपक शिकारपूर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगार चलाख पद्धतीने गुन्हे करत आहेत. गुन्हेगार संगणकाच्या पडद्यामागे बसून लाखो लोकांची माहिती चोरतात, बँक खाती रिकामी करतात, बनावट व्हिडीओ तयार करतात आणि उद्योगांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान पोहोचवतात. सायबर गुन्हेगारीचे स्वरूप आता केवळ तांत्रिक राहिलेले नाही, तर सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेपुढील मोठे आव्हान बनले आहे.

 

आजचे जग पूर्णपणे डिजिटल झाले आहे. बँकिंग, शिक्षण, आरोग्य, व्यापार, शासन, संवाद, मनोरंजन, वाहतूक अशा प्रत्येक क्षेत्रात संगणक आणि इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला असून समाजमाध्यमे लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र शिक्षण, क्लाऊड संगणन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, मोठ्या प्रमाणातील माहिती विश्लेषण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवाचे जीवन अधिक वेगवान आणि सोयीस्कर झाले आहे. परंतु ज्या तंत्रज्ञानामुळे विकास साधला जात आहे, त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगार अत्यंत धोकादायक आणि चलाख पद्धतीने गुन्हे करत आहेत. पूर्वी चोर घर फोडत असत, पाकीटमार गर्दीत चोरी करत असत; परंतु आता गुन्हेगार संगणकाच्या पडद्यामागे बसून लाखो लोकांची माहिती चोरतात, बँक खाती रिकामी करतात, बनावट व्हिडीओ तयार करतात, प्रतिष्ठा नष्ट करतात आणि उद्योगांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान पोहोचवतात. सायबर गुन्हेगारीचे स्वरूप आता केवळ तांत्रिक राहिलेले नाही, तर सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मोठे आव्हान बनले आहे.

सायबर गुन्हेगारी म्हणजे संगणक, इंटरनेट, मोबाईल, डिजिटल नेटवर्क किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून केलेले गैरकृत्य. यामध्ये माहिती चोरी, आर्थिक फसवणूक, हॅकिंग, बनावट संकेतस्थळे, फिशिंग, मालवेअर, रॅन्समवेअर, समाजमाध्यमांवरील छळ, ओळख चोरी, डीपफेक, अश्लील सामग्री प्रसारित करणे, डिजिटल ब्लॅकमेलिंग, सायबर स्टॉकिंग अशा अनेक प्रकारांचा समावेश होतो. आज या सर्व प्रकारांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता एआय म्हणजे संगणकाला मानवी विचारसरणीप्रमाणे शिकण्याची, निर्णय घेण्याची आणि विश्लेषण करण्याची क्षमता देणारे तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान उद्योग, वैद्यकीय क्षेत्र, शेती, शिक्षण, संशोधन यासाठी अत्यंत उपयुक्त आहे; परंतु सायबर गुन्हेगारांनी त्याचा दुरुपयोग सुरू केला आहे. आज फिशिंग म्हणजेच सावज हेरण्यासाठी केले जाणारे हल्ले अधिक धोकादायक झाले आहेत. पूर्वी फसवणूक करणाऱ्या ईमेल व्याकरणदृष्ट्या चुकीच्या आणि सहज ओळखता येण्यासारख्या असत. आता कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून केलेल्या ईमेल अत्यंत विश्वासार्ह वाटतात. या मेल संबंधित व्यक्तीच्या नावाने, कार्यालयाच्या शैलीत किंवा बँकेच्या अधिकृत भाषेत लिहिलेल्या असतात. गुन्हेगार समाजमाध्यमांवरील माहिती, नोकरीचे तपशील, मित्रपरिवार, आवडी-निवडी यांचा अभ्यास करून अत्यंत वैयक्तिक स्वरूपाचे संदेश पाठवतात. त्यामुळे सामान्य व्यक्ती सहज फसते.
भारतामध्ये अनेक नागरिकांना ‘तुमचे बँक खाते बंद होणार आहे’, ‘केवायसी अपडेट करा’, ‘तुम्ही लॉटरी जिंकली आहे’ किंवा ‘तुमच्या खात्यातून पैसे कापले गेले’ अशा संदेशांद्वारे फसवले जाते. काही प्रकरणांमध्ये बनावट ग्राहक सेवा क्रमांक तयार करून लोकांकडून दूरध्वनीद्वारे गुप्त माहिती मिळवली जाते. अलीकडील काळात भारतातील अनेक शहरांमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’चे प्रकार समोर आले. पोलीस, अंमलबजावणी अधिकारी किंवा न्यायालयीन अधिकारी असल्याचे भासवून गुन्हेगार नागरिकांना घाबरवतात आणि ऑनलाईन पैसे उकळतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार होणारे ‘डीपफेक’ हे आधुनिक काळातील सर्वात मोठे संकट मानले जात आहे. डीपफेक तंत्रज्ञानाद्वारे एखाद्या व्यक्तीचा चेहरा, आवाज किंवा हालचाली हुबेहूब नक्कल करून बनावट व्हिडीओ किंवा ध्वनिफीत तयार करता येते. काही महिन्यांपूर्वी भारतातील अनेक प्रसिद्ध कलाकार आणि उद्योजक यांच्या नावाने समाजमाध्यमांवर बनावट व्हिडीओ प्रसारित झाले होते. काही गुन्हेगारांनी उद्योगपतींच्या आवाजाची नक्कल करून कर्मचाऱ्यांना आर्थिक व्यवहार करण्याचे आदेश दिले. परदेशात एका कंपनीच्या अधिकाऱ्याला त्याच्या वरिष्ठांचा बनावट आवाज ऐकवून लाखो डॉलर्सची फसवणूक करण्यात आली होती. अशा घटना भारतातही वाढू लागल्या आहेत. महिलांविरोधातील सायबर गुन्ह्यांमध्येही डीपफेक आणि मॉर्फिंगचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. समाजमाध्यमांवरील फोटो वापरून बनावट अश्लील चित्रफिती तयार केल्या जातात आणि त्याद्वारे ब्लॅकमेल केले जाते. विद्यार्थिनी, व्यावसायिक महिला, कलाकार आणि सार्वजनिक जीवनातील व्यक्ती या विशेषतः या प्रकाराला बळी पडतात. अशा प्रकारांमुळे मानसिक ताण, सामाजिक अपमान आणि आत्महत्येसारख्या घटना घडण्याचा धोका वाढतो. रॅन्समवेअर हा आणखी एक गंभीर सायबर हल्ला आहे. यामध्ये संगणकातील माहिती हडप केली जाते आणि ती पुन्हा मिळवण्यासाठी खंडणी मागितली जाते. रुग्णालये, बँका, उद्योग, सरकारी कार्यालये यांच्यावर अशा हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. भारतातील काही मोठ्या रुग्णालयांच्या संगणक प्रणालींवर हल्ले झाल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली होती. काही वर्षांपूर्वी देशातील एका प्रमुख वैद्यकीय संस्थेची माहिती प्रणाली ठप्प होऊन हजारो रुग्णांची माहिती धोक्यात आली होती. अशा घटनांमुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण होतो. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पासवर्ड फोडण्याची प्रक्रिया शक्य आणि वेगवान झाली आहे. अनेक लोक जन्मतारीख, मोबाईल क्रमांक किंवा साधे शब्द पासवर्ड म्हणून वापरतात. कृत्रिम बुद्धिमत्ता काही क्षणांमध्ये लाखो संभाव्य संयोजनांचा अभ्यास करून योग्य पासवर्ड शोधू शकते. बॉट्सच्या मदतीने ताशी हजारो प्रयत्न केले जातात. त्यामुळे दुबळे पासवर्ड वापरणारे खाते सहज हॅक होते.

समाजमाध्यमे ही सायबर गुन्हेगारांसाठी मोठी शस्त्रे बनली आहेत. एखाद्या व्यक्तीची जीवनशैली, मित्रपरिवार, कार्यालय, प्रवास, आर्थिक स्थिती याबाबतची माहिती सहज उपलब्ध होते. गुन्हेगार या माहितीचा वापर करून भावनिक किंवा आर्थिक फसवणूक करतात. काहीजण खोट्या प्रोफाइलद्वारे मैत्री करतात, विश्वास संपादन करतात आणि नंतर पैशांची मागणी करतात. ‘ऑनलाईन प्रेमसंबंध’ आणि ‘गुंतवणूक सल्ला’ या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. क्रिप्टोकरन्सी आणि ऑनलाईन गुंतवणूक योजनांमुळेही नवीन प्रकारची सायबर गुन्हेगारी वाढली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने बनावट गुंतवणूक संकेतस्थळे, बनावट नफा दाखवणारे आकडे आणि खोटे ग्राहक अभिप्राय तयार केले जातात. लोकांना अल्पावधीत मोठा नफा मिळेल असे सांगून पैसे गुंतवायला भाग पाडले जाते. एकदा पैसे जमा झाले की संकेतस्थळ गायब होते. इंटरनेट ऑफ थिंग्जमुळे घरातील अनेक उपकरणे इंटरनेटशी जोडली गेली आहेत. स्मार्ट दूरचित्रवाणी, सुरक्षा कॅमेरे, स्मार्ट कुलपे, रेफ्रिजरेटर, आवाजावर चालणारी उपकरणे यांमध्ये पुरेशी सुरक्षा नसल्यास गैरवापर होऊ शकतो. गुन्हेगार या उपकरणांमध्ये प्रवेश मिळवून घरातील हालचालींची माहिती मिळवून मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ले करण्यासाठी त्यांचा वापर करू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून दिशाभूल करणारी माहितीही मोठ्या प्रमाणावर पसरवली जाते. निवडणुका, धार्मिक प्रश्न किंवा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील मुद्द्यांवर बनावट संदेश आणि व्हिडीओ प्रसारित करुन समाजात भीती, द्वेष आणि अस्थिरता निर्माण केलीजाऊ शकते.

सायबर गुन्ह्यांविरोधात कायदे असले तरी तंत्रज्ञानाचा वेग खूप मोठा आहे. गुन्हेगार अनेकदा परदेशातून काम करतात. तेव्हा ओळख लपवण्यासाठी व्हर्च्युअल नेटवर्क, बनावट उपकरणे आणि गुप्त तंत्रांचा वापर केला जातो. त्यामुळे तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहते. या परिस्थितीत केवळ सरकार किंवा पोलीस यंत्रणा पुरेशा नाहीत. प्रत्येक नागरिकाने सायबर सुरक्षेबाबत जागरूक होणे आवश्यक आहे. कोणत्याही अनोळखी दुव्यावर क्लिक करू नये, बँक माहिती किंवा संकेतशब्द कोणालाही सांगू नयेत, समाजमाध्यमांवर अतिवैयक्तिक माहिती शेअर करू नये, मजबूत संकेतशब्द वापरावेत. शैक्षणिक संस्था, उद्योग आणि शासन यांनीही आधुनिक सुरक्षाप्रणाली वापरणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सुरक्षा साधने, माहिती सांकेतिकीकरण, नियमित बॅकअप, सुरक्षा तपासणी आणि कर्मचारी प्रशिक्षण यामुळे धोका कमी करता येतो. भारत सरकारने राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण, सायबर गुन्हे तक्रार पोर्टल आणि डिजिटल सुरक्षा मोहिमा सुरू केल्या आहेत. तरीही सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे कायम सतर्कता ठेवावी लागणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवजातीसाठी अत्यंत शक्तिशाली आणि उपयुक्त निर्मिती आहे; परंतु या तंत्रज्ञानाचा विकास ज्या वेगाने होत आहे, त्याच वेगाने सायबर गुन्हेगारही चलाख आणि धोकादायक होत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर, डिजिटल साक्षरता, मजबूत कायदे आणि जागतिक सहकार्य ही काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. सायबर सुरक्षितता ही आता केवळ तांत्रिक बाब राहिलेली नाही; तर प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी, प्रतिष्ठेशी आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलेली आहे. म्हणूनच तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर करणे आवश्यकआहे.

Comments
Add Comment