Tuesday, June 9, 2026

Eknath Shinde : मोदींच्या १२ वर्षांच्या नेतृत्वामुळे भारत विकासाच्या नव्या उंचीवर

Eknath Shinde : मोदींच्या १२ वर्षांच्या नेतृत्वामुळे भारत विकासाच्या नव्या उंचीवर

नेहरूंचा कार्यकाळ मागे टाकत मोदींनी घडविला विकासाचा नवा अध्याय

अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, गरीब कल्याण आणि पायाभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक प्रगतीचा दावा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवरही साधला निशाणा

मुंबई, ता. ९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकाळाच्या बाबतीत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकला असून गेल्या बारा वर्षांत त्यांनी यशस्वी नेतृत्व दिले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकास, अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचे सांगितले.

नरेंद्र मोदी यांची ओळख कोणत्याही प्रकारचा डाग नसलेले आणि एकही सुट्टी न घेता काम करणारे पंतप्रधान अशी आहे. देशातच नव्हे तर जगभरात त्यांना सर्वाधिक लोकप्रियता लाभली आहे. त्यांच्या नावावर अनेक जागतिक विक्रम असून विविध देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून भारताची जागतिक प्रतिमा उंचावण्याचे काम त्यांनी केल्याचे शिंदे म्हणाले.

२०१४ नंतर मोदी यांनी देशाला विकासाच्या मार्गावर नेले. भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून आता ती तिसऱ्या क्रमांकाकडे झेपावत आहे. जगातील अनेक अर्थव्यवस्था संकटात असताना भारताने मजबूत आर्थिक प्रगती साधली आहे. विकसित भारत २०४७चा संकल्प पूर्ण करण्यासाठी मोदी देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जात असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

२०१४ पूर्वी देशात मोठमोठे भ्रष्टाचार आणि घोटाळे होत होते. मात्र मोदी सरकारच्या काळात विरोधकांना एकही घोटाळा सिद्ध करता आलेला नाही. त्यामुळे "बेदाग पंतप्रधान" अशी मोदी यांची ओळख निर्माण झाली आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.

पहलगाम येथे माता-भगिनींच्या सन्मानावर आघात करण्याचे काम पाकिस्तानने केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने घरात घुसून कारवाई केली. मोदी यांच्या ठाम नेतृत्वामुळेच हे शक्य झाले, असे शिंदे म्हणाले. आतापर्यंत अनेकांनी "गरीबी हटाव"च्या घोषणा दिल्या; मात्र गरिबी कमी करण्याचे काम मोदी सरकारने प्रत्यक्षात केले. सुमारे ३२ कोटी नागरिकांना गरिबीरेषेबाहेर आणण्यात यश आले आहे. तसेच ८० कोटी गरीब नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे त्या आत्मनिर्भर बनत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात रस्ते, पूल, महामार्ग, रेल्वे, विमानतळ आणि इतर पायाभूत सुविधांच्या निर्मितीत मोठी वाढ झाली आहे. २०१४ पूर्वी जितक्या सुविधा निर्माण झाल्या होत्या, त्यापेक्षा अधिक सुविधा मागील बारा वर्षांत उभारण्यात आल्याचा दावा शिंदे यांनी केला.

राहुल गांधी देशात असोत किंवा परदेशात, ते सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताची बदनामी करत असतात, असा आरोप शिंदे यांनी केला. ऑपरेशन सिंदूरच्या वेळीही त्यांनी भारतीय जवानांवर अविश्वास दाखवला. राहुल गांधींनी किमान एक वर्ष सातत्याने देशात राहून काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

विरोधक मोदींवर जितके आरोप करतील, तितक्या ताकदीने जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील. राहुल गांधी मोदी फार काळ पंतप्रधान राहणार नाहीत असे म्हणत असले, तरी त्यांच्या कामामुळे ते आणखी दीर्घकाळ देशाचे नेतृत्व करतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केंद्रातून पाठविलेल्या एका रुपयातील केवळ १५ पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात, असे म्हटले होते. यावरून त्याकाळातील भ्रष्टाचार स्पष्ट होतो. मोदी सरकारने थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची व्यवस्था केली. मोदी "नेशन फर्स्ट" मानतात, तर विरोधक "करप्शन फर्स्ट" या भूमिकेत असल्याची टीका त्यांनी केली.

मोदी हे खरे देशभक्त असून विरोधकांना देशाबद्दल प्रेम उरलेले नाही. टीका, टिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोप एवढेच काम विरोधकांकडे राहिले असल्याचा टोला शिंदे यांनी लगावला. एनडीएचा चेहरा नरेंद्र मोदी आहेत; मात्र इंडिया आघाडीचा चेहरा कोण आहे, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. विरोधकांमध्ये एकजूट उरलेली नसल्याचा दावा करत त्यांनी विविध घटक पक्षांच्या पराभवांचा उल्लेख केला. काही नेत्यांनी बैठकींना दांडी मारली, तर काही जण ऑनलाइन सहभागी झाले. इंडिया आघाडीतील घटक पक्ष शोधावे लागतील अशी परिस्थिती निर्माण झाल्याची उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि आपण एक टीम म्हणून काम केले आणि आताही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण एकत्रितपणे काम करत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. सर्व कार्यक्रमांमध्ये आम्ही एकत्र सहभागी होतो आणि आमच्यातील समन्वय कायम राहील, असे त्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांच्या भावना असतात. त्या अनुषंगाने बच्चू कडू यांनी काही विधान केले असावे, असे सांगत शिंदे यांनी स्पष्ट केले. महायुतीची लढाई सत्तेच्या खुर्चीसाठी नसून महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे. राज्यातील जनतेचे कल्याण आणि विकास हा आमचा मुख्य अजेंडा आहे. महायुतीतील आमदार किंवा खासदारांना काही अडचणी असल्यास त्या चर्चा करून सोडविल्या जातील, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. शेवटी, गेल्या बारा वर्षांत देशाला विकासाच्या मार्गावर नेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा आणि अभिनंदन व्यक्त करत त्यांच्या नेतृत्वाखाली भारत आणखी प्रगती करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त के

Comments
Add Comment