Crime News : अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शनी चौक परिसरातील गुजर गल्लीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांना आग लावण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, एक दिवस आधीच दोन आलिशान कार जाळण्यात आल्या होत्या आणि आता त्याच कुटुंबाच्या दुचाकीला आग लावण्याचा प्रयत्न झाल्याने हा प्रकार अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ( Ahilyanagar Crime News )
आधी कार आता दुचाकी जळून खाक
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव विनायक कुलकर्णी यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन आलिशान चारचाकी वाहनांना गुरुवारी मध्यरात्री आग लावण्यात आली होती. काही क्षणांतच दोन्ही वाहने जळून खाक झाली आणि परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेची चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा त्यांच्या दुचाकीला आग लावण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे.( Ahilyanagar Crime News )
Nashik Onion Farmer : मागील अनेक दिवसांपासून कमी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं. योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात ...
कोणी टार्गेट करतंय ?
सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे कुलकर्णी कुटुंबीयांसह संपूर्ण गुजर गल्ली परिसरात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. “नेमकं कोण आणि का टार्गेट करतंय?” असा प्रश्न स्थानिक नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील महत्त्वाचा धागा आता सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमधून समोर आला आहे. घटनास्थळाजवळील कॅमेऱ्यांमध्ये तीन संशयित व्यक्ती वाहनाजवळ फिरताना स्पष्टपणे दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार नियोजनबद्ध असल्याची शक्यता अधिक बळावली आहे.
अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52 लाख 80 हजार रुपयांचा दरोडा टाकल्याची ...
घटनेची गंभीर दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी भेट देत पोलिसांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून सीसीटीव्हीत दिसणाऱ्या संशयितांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मात्र सलग दोन दिवस एकाच कुटुंबाच्या वाहनांना लक्ष्य केल्याने अहिल्यानगरमध्ये भीतीसोबतच अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.