Wednesday, June 3, 2026

BMC News : बेलगाम सल्लागार नियुक्ती बसणार आळा

BMC News : बेलगाम सल्लागार नियुक्ती बसणार आळा

सल्लागारांच्या निवडीबाबत तत्काळ धोरण बनवण्याचे स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आदेश

मुंबई : मुंबई महापालिकेत सध्या विविध प्रकल्प कामांमध्ये सल्लागारांची मोठ्या संख्येने नियुक्ती केली जात असून सरसकट सर्वंच कामांमध्ये सल्लागार नियुक्त करण्यात येत असल्यामुळे या बेलगाम सल्लागार नियुक्तीला आता आळा घातला जाणार आहे. या सल्लागारांच्या सरसकट सर्वंच नियुक्तीबाबत लगाम लावण्यासाठी महापालिकेच्यावतीने आता ठोस मार्गदर्शक तत्वे बनवली जाणार आहेत. यामध्ये किती कोटी रुपयांच्या कामांसाठी सल्लागारांची नियुक्ती केली जावीत आणि कोणती कामे विभागामार्फत केली जावीत याचा समावेश असेल. याबाबतचे धोरण त्वरीत बनवून स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला दिले.

मुंबई महापालिकेच्यावतीने भांडुप (Bhandup) संकुलातील २ हजार दशलक्ष लिटरचे नवीन पंपिंग स्टेशन (Pumping Station), ९१० दशलक्ष लिटरचा नवीन जलशुध्दीकरण प्रकल्प, मोडकसागरपासून गुंदवली आणि जांबिवली पर्यंतचे दोन जलबोगदे तसेच समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प आदी कामांसाठी सल्लागार नियुक्तीचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये राखून ठेवले होते. याबाबत समिती अध्यक्षांनी सादरीकरण करण्याचे आदेश विभागाला दिले होते. त्यानुसार बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सल्लागारांची निवड का करण्यात येते याबाबतचे सादरीकरण करून अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी समितीला माहिती दिली.यापूर्वी धरणापासून ते पाण्याचा प्रत्येक प्रकल्पांमध्ये सल्लागारांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले.

ही माहिती देताना, बांगर यांनी सल्लागाराच्या कामाचे स्वरुप पटवून सांगतानाच सल्लागार नेमताना विभागाने विवेक पाळला गेला पाहिजे. काही कामे सल्लागार न नेमता विभागाने केली पाहिजेत. यासाठी विभागाने सल्लागारांना नियुक्त केली जावे या मताचे आम्ही असून यासाठी लवकरच एक मार्गदर्शक धोरण सल्लागारांच्या एकूण नियुक्तीबाबत बनवले जाईल,असे सांगितले. त्यामुळे किती कोटी रुपयांच्या प्रकल्प कामांकरता सल्लागार नियुक्त केला जावा आणि कोणती कामे आणि किती कोटी रुपयांची कंत्राट कामे ही महापालिकेच्या विभागामार्फत केली जावीत याबाबत वस्तूनिष्ठ धोरण बनवण्यात येणार असल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले.

यावेळी सादरीकरणाबाबत बोलतांना गारगाई धरणाच्या कामांमध्ये विस्तृत आराखडा अहवाल बनवणाऱ्या संस्थेला प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले नसल्याचे सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ सईदा खान यांनी सन २०४१ पर्यंतची पाण्याची तहान भागवण्यासाठी कोकणातून पाणी मुंबईल आणले जावे अशी सूचना केली. प्रकाश दरेकर (Pravin Darekar) यांनी कोयनेचे पाणी वशिष्ट नदीतून वाहून जात असल्याने त्यातील पाणी मुंबईला आणले जावी अशी सूचना केली. तर उबाठाचे यशोधर फणसे यांनी महापालिकेच्या प्रत्येक प्लॅनिंग विभागाला सक्षम बनवा अशी सूचना करत आयआयटीसारख्या (IIT) तज्ज्ञ आणि हुशार अभियंत्यांच्या (Engineers) निवड करण्यात यावी . जेणेकरून सल्लागारांची गरजही भासणार नाही. तर श्रध्दा जाधव यांनी जलखात्यात अनेक निवृत्त अधिकारी असून त्यांची या प्रकल्प कामांसाठी मदत घेण्यात यावी,असे सांगत एकप्रकारे हे वाढते सल्लागार महापालिकेला आतून पोखरत असल्याचे सांगितले. तर भाजपच्या प्रिती सातम यांनी महापालिकेच्यावतीने सल्लागार सेल निर्माण करण्यात येणार होते आणि यामध्ये निवृत्त अधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार होती, त्यांचे काय झाले असा सवाल केला. तर भाजपचे हरिष भांदीर्गे यांनी मागील २५ वर्षांत किती सल्लागार नेमले आहेत याची माहिती देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत गणेश खणकर, यामिनी जाधव, मिनाक्षी पाटणकर, मकरंद नार्वेकर, अंजली नाईक, शितल गंभीर आदींनी चर्चेत सहभाग घेवून प्रशासनाला सवाल केला.

यावेळी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सल्लागारांबाबत सदस्यांनी आपल्या भावना मांडल्या असून सल्लागारांवर जास्त निधी खर्च होत असल्याने या भावना असून आपले महापालिका अभियंता परिपूर्ण आहेत. यामुळे सल्लागारांच्या नियुक्तीबाबत महापालिकेने धोरण ब बनवावे, परंतु ते कागदावर राहू नये. ते स्थायी समितीसमोर यायला हवे. त्यामुळे जिथे सल्लागाराची गरज नाही तिथे सल्लागार नेमले जावू नये यासाठी हे धोरण तातडीने बनवले जावे असे निर्देश प्रभाकर शिंदे यांनी दिले.

Comments
Add Comment