प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद २' (Deool Band 2) हा मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) चांगली कमाई करताना दिसत आहे. 'देऊळ बंद'च्या यशानंतर आलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, स्वामी समर्थांच्या भूमिकेत दिसलेले अभिनेते मोहन जोशी यांच्याही अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. शेतकरी आणि ग्रामीण भागातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आधारित असलेल्या या चित्रपटाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेक ठिकाणी थिएटरमध्ये चांगली गर्दी पाहायला मिळत आहे. स्वामी समर्थांचे भक्त आणि मराठी चित्रपटप्रेमी मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे वळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईत सातत्याने वाढ होत आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, चित्रपट प्रदर्शनाच्या १२ व्या दिवशी म्हणजे सोमवारी 'देऊळ बंद २ 'ने सुमारे २.६० कोटी रुपयांची कमाई केली. याआधी ९ व्या दिवशी ३.१० कोटी,१० व्या दिवशी ५ कोटी आणि ११ व्या दिवशी ५.७५ कोटी रुपयांचा गल्ला चित्रपटाने जमवला होता.
या चित्रपटाचे एकूण नेट कलेक्शन ४६.६५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असून, ग्रोस कलेक्शन ५४.८८ कोटी रुपये झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, सुमारे १० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने खर्चाच्या तुलनेत अनेकपटीने कमाई केली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या 'देऊळ बंद २'ची जोरदार चर्चा असून, येत्या काही दिवसांत चित्रपट आणखी किती कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता हा चित्रपट यंदाच्या यशस्वी मराठी चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवेल, अशी चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर देखील चित्रपटाचे काही सीन्स व्हायरल होत आहे. प्रेक्षकांडून या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाथ मिळाला आहे.