Friday, May 29, 2026

Pune Food Stalls : पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! रात्री 10 नंतर फूड स्टॉल्स, खाऊगल्ल्या बंद

Pune Food Stalls : पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! रात्री 10 नंतर फूड स्टॉल्स, खाऊगल्ल्या बंद

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ल्यांवर आता रात्री १० वाजताच शटर डाउन (Shut Down) होणार आहे. शहरातील वाढती गर्दी, वाहतूक कोंडी (Traffic) आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेत पुणे पोलिसांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व खाऊगल्ल्या, पथारी व्यवसाय, फूड स्टॉल्स आणि फुटपाथवरील आउटडोअर डायनिंग (Outdoor Dining) रात्री १० वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुण्यातील विद्यार्थी (Students), रात्री उशिरा काम करणारे कर्मचारी आणि छोट्या व्यावसायिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.

पुणे पोलिसांनी सलग दोन दिवस शहरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. अनेक खाऊगल्ल्या मध्यरात्रीपर्यंत सुरू राहत असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. यामुळे वाहतूक कोंडी, गोंधळ आणि सार्वजनिक शांततेवर परिणाम होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर रात्री १० नंतर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून, व्हॅनद्वारे (van) स्टॉल्स (Stalls) बंद करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

या आदेशामुळे पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या हजारो विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असल्याने त्यांचा आधार खाऊगल्ल्यांवरील स्वस्त आणि परवडणाऱ्या जेवणावर असतो. मात्र आता १०नंतर सर्व काही बंद होत असल्याने विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. महागड्या हॉटेलमध्ये (Hotel) जेवण करणे अनेकांना परवडत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

दुसरीकडे, या निर्णयाचा सर्वाधिक फटका छोट्या व्यावसायिकांना बसत आहे. खाऊगल्ल्यांमधील अनेक विक्रेत्यांच्या मते, त्यांचा मुख्य व्यवसाय रात्री १० नंतरच सुरू होतो आणि तो मध्यरात्रीपर्यंत चालतो. नवीन आदेशामुळे ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, व्यवसायावर थेट परिणाम झाला आहे. आधीच महागाईमुळे भाजीपाला, तेल, गॅस आणि इंधन दर वाढलेले असताना आता व्यवसायातील कमाईही कमी झाल्याने अनेक स्टॉलधारक आर्थिक संकटात सापडले आहेत.

दरम्यान, आगामी बकरी ईद, विविध सण-उत्सव आणि इंधन दरवाढीमुळे होऊ शकणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारचे मोर्चे, सभा आणि मिरवणुका घेण्यास सध्या बंदी आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने खाऊगल्ल्यांवर वेळेची मर्यादा आणल्याचे सांगितले जात असले, तरी या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिक यांच्यात अस्वस्थता वाढताना दिसत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >