मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खंदे शिलेदार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे अखेर उद्या (शनिवारी, ३० मे) भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार असून, अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून तनपुरे यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतल्यापासूनच प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्या राजकीय भूमिकेविषयी तर्कवितर्क लढवले जात होते, त्यावर आता या भाजप प्रवेशामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १ जून असल्याने, उद्याच्या पक्षप्रवेशानंतर पुढील २४ तासांत अहिल्यानगरच्या राजकारणाला अत्यंत अनपेक्षित वळण मिळण्याची चिन्हे आहेत. पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याचे फळ म्हणून भाजपकडून त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली जाणार असल्याचे समजते.
Nashik TCS case : नाशिकच्या TCS प्रकरणातील मोठी घडामोड समोर आली आहे. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील (Nashik TCS) महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि ...
या सर्व राजकीय घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती प्राजक्त तनपुरे यांच्या सोशल मीडियावरील (Social Media) 'डीपी'ची. एकीकडे भाजप प्रवेशाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच, तनपुरे यांनी आपल्या फेसबुक आणि इतर सोशल मीडिया अकाऊंटवर आपले मामा आणि शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा फोटो लावला आहे. शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू नेत्याच्या भाच्यानेच आता ‘कमळ’ हाती घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
निष्ठावंतांचे राजकारण संपवले जातेय - तनपुरेंची खंत
राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेताना प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केलेली खंतच त्यांच्या पक्षांतराचे मुख्य कारण मानली जात आहे. "माझ्यासोबत पक्षात असणारे तिघेजण अजित पवार गटात गेले आणि त्यांना थेट कॅबिनेट (Cabinet) मंत्रीपद मिळाले. मात्र, दुसरीकडे आमच्यासारख्या निष्ठा ठेवणाऱ्या नेत्यांचे राजकारण पद्धतशीरपणे संपवले जात आहे," अशी उद्विग्न भावना त्यांनी बोलून दाखवली होती. पक्षात होत असलेल्या याच कोंडीमुळे त्यांनी अखेर राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू पिऊन मृत्यूकांडामागचं खरं कारण आता समोर आलं आहे. या प्रकरणात झालेल्या तपासात ...
अहिल्यानगरचे सत्तासमीकरण बदलणार
प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने अहिल्यानगर जिल्ह्यात एक मोठा, अभ्यासू आणि तरुण चेहरा आपल्या गळाला लावण्यात भाजपला यश आले आहे. १ जून रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने, उद्याच्या पक्षप्रवेशानंतर लगेचच तनपुरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा भाजपकडून (BJP) केली जाऊ शकते. भाजपच्या या मोठ्या राजकीय खेळीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारंपरिक सत्तासमीकरणे मात्र पूर्णपणे बदलणार आहेत.