Friday, May 29, 2026

Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात मान्सूनला ब्रेक! ११ जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्यता कमी, IMD चा मोठा अंदाज

Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात मान्सूनला ब्रेक! ११ जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्यता कमी, IMD चा मोठा अंदाज

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. केरळमध्ये मान्सूनच्या (Monsoon) आगमनाची अधिकृत तारीख भारतीय हवामान विभागाकडून (IMD) अद्याप जाहीर करण्यात आलेली नसल्याने पावसाची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. दरम्यान, हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील पुढील दोन आठवड्यांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, ११ जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या (Maharashtra Weather Update) अंदाजानुसार, महाराष्ट्रातील किनारपट्टी भाग तसेच राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस पडू शकतो. त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, मुंबईत मान्सून (Monsoon) दाखल होण्याची सरासरी तारीख ११ जून मानली जाते. मात्र, यंदा मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावल्याचे चित्र दिसत आहे.

महाराष्ट्रात कुठे आणि कधी पडणार पाऊस?

IMD च्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात ४ जूनपर्यंत काही ठिकाणी दररोज सुमारे १० मिलीमीटर इतका तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर ४ जून ते ११ जून या कालावधीत किनारपट्टी भागात पावसाचा जोर काही प्रमाणात वाढू शकतो. याच काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्येही पावसाची व्याप्ती वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोकण, गोवा आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

हवामान विभागाच्या माहितीनुसार, ३१ मे ते ३ जून दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो. या काळात वातावरणात मोठे बदल होण्याची शक्यता असून, काही भागांत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यानंतरच्या आठवड्यात मान्सूनचे वारे दक्षिण भारतातील काही भागांमध्ये पुढे सरकण्याची शक्यता आहे. तसेच, ४ ते ११ जून या कालावधीत कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

देशातील १५ राज्यांमध्ये पावसाचा आणि वादळी वाऱ्यांचा अलर्ट (Alert)

दरम्यान, हवामान विभागाने शुक्रवार, २९ मे रोजी देशातील १५ राज्यांसाठी मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा जारी केला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये ताशी ९० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या बदलत्या हवामानामुळे देशातील अनेक भागांमध्ये तापमानात (Temperature) घट होऊन नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. हवामान विभागाने (India Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत वायव्य भारत, राजस्थान, विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये तापमान कमी होण्याची शक्यता आहे.

उत्तर आणि पूर्व भारतात वादळी पावसाचा इशारा

२९ मे ते ३१ मे दरम्यान उत्तर, मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, पुढील २ ते ३ दिवसांत ईशान्य आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने अलर्ट जारी केलेल्या प्रमुख राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >