Thursday, May 28, 2026

सावरकरांच्या प्रतिमा वापरून फक्त धर्मात तेढ पसरवणे सुरू; राज ठाकरे

सावरकरांच्या प्रतिमा वापरून फक्त धर्मात तेढ पसरवणे सुरू; राज ठाकरे

राज ठाकरे; टीकाकारांना सावरकर कधी कळलेच नाहीत

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे प्रखर हिंदू धर्मभिमानी असले तरी त्यांनी धर्मातील त्रुटींवर बोट ठेवायला कधीही मागेपुढे पाहिले नाही. मात्र, दुर्दैवाने आज त्याच सावरकरांच्या महाराष्ट्रात त्यांच्या प्रतिमांचा वापर करून केवळ आणि केवळ धर्मात तेढ पसरवण्याचे घाणेरडे राजकारण सुरू आहे, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्त केले. 'सावरकरांच्या टीकाकारांना ते कधी कळलेच नाहीत, पण त्यांचा उदोउदो करून मतांची बेगमी करणाऱ्यांना तरी सावरकर समजलेत का?' असा सवाल करत त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही खडे बोल सुनावले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहून महाराष्ट्राच्या सद्य राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, सावरकर हे केवळ हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्त्वज्ञ नव्हते, तर ते क्रियाशील धर्मसुधारक, समाजसुधारक आणि अत्यंत विज्ञाननिष्ठ महापुरुष होते. मात्र, ज्या भूमीत सावरकर जन्माला आले, तिथे आज 'व्हॉट्सॲप विद्यापीठा'त येणारे खोटे संदेश सत्य-असत्य न तपासता खरे मानण्याची चढाओढ लागली आहे. याच महाराष्ट्रात आजचे राजकारणी भोंदू बाबांच्या भजनी लागले आहेत, तर तरुण पिढीला उत्सव आणि डीजेच्या तालावर गुंतवून ठेवले जात आहे. जिथे सावरकरांनी जाती अंताचा लढा दिला, त्याच महाराष्ट्रात आज जातींवरून डोकी फोडण्याचे प्रकार सुरू आहेत आणि दुर्दैवाने याला सत्ताधारीच खतपाणी घालत आहेत", अशी टीका त्यांनी केली.

उठता-बसता सावरकरांचा तिरस्कार करणाऱ्यांना बाजूला ठेवा, पण जे त्यांचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करत आहेत, त्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपण कोण होतो, आपली महाराष्ट्राची परंपरा किती उज्ज्वल होती, हेच जर आपण विसरलो, तर पुढे जाण्याचा मार्ग कसा आखणार? यासाठी जर आपण केवळ सत्तेला आसुलेले राजकारणी आणि व्हॉट्सॲप विद्यापीठातील खोट्या नरेटिव्ह्जवर अवलंबून राहणार असू, तर महाराष्ट्राचे भविष्य कठीण आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

विज्ञाननिष्ठ सावरकर

सावरकरांना कधीच कोणत्याही व्यक्तीचा अंध उदोउदो मान्य नव्हता. प्रत्येक गोष्ट तर्क आणि विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहिली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे, आपण कोण होतो हे ओळखून आपल्या परंपरेतील उत्तम गोष्टी स्वीकारणे आणि प्रत्येक गोष्टीला तर्काच्या कसोटीवर घासून पाहणे, हीच सावरकरांना खरी श्रद्धांजली ठरेल; अन्यथा तो केवळ एक उपचार ठरेल, असे राज ठाकरे म्हणाले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा