Sunday, May 24, 2026

Dombivli Marriage News : कोर्ट मॅरेजनंतर घरच्यांनी लग्न लावून देण्याचं दिलं आश्वासन; दुसऱ्याच दिवशी नवरी बेपत्ता

Dombivli Marriage News : कोर्ट मॅरेजनंतर घरच्यांनी लग्न लावून देण्याचं दिलं आश्वासन; दुसऱ्याच दिवशी नवरी बेपत्ता

डोंबिवली : प्रेमविवाहाला (Love Marriage) कुटुंबियांचा विरोध, घरच्यांच्या नाराजीमुळे दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न करणं, अशा घटना अनेकदा समोर येतात. मात्र, डोंबिवलीत (Dombivli) घडलेल्या एका विचित्र आणि धक्कादायक प्रकाराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल आठ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करणाऱ्या तरुण-तरुणीने कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता कोर्ट मॅरेज (Court Marriage) केलं. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी दोघांचं विधिवत लग्न लावून देण्याचं आश्वासन दिलं. मात्र, लग्नाच्या आदल्या दिवशी तरुणीला घेऊन तिचे कुटुंबीय अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पतीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना डोंबिवली परिसरात घडली आहे. ओमकार आणि शिवानी हे दोघेही डोंबिवलीत राहणारे असून गेल्या आठ वर्षांपासून (8 Years) त्यांच्यात प्रेमसंबंध होते. एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेत त्यांनी १५ मे रोजी कोर्ट मॅरेज (Court Marriage) केलं. मात्र, या विवाहाची माहिती शिवानीच्या कुटुंबीयांना नव्हती. याच काळात शिवानीच्या घरच्यांनी तिच्यासाठी दुसरा मुलगा पसंत केला होता. संबंधित मुलगा शिवानीला पाहण्यासाठी तिच्या घरीदेखील आला होता. शिवानीने त्याच्याशी विवाह करण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र, कुटुंबियांकडून तिने त्या मुलाला होकार द्यावा यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, ओमकार आणि शिवानी यांनी त्यांच्या कोर्ट मॅरेजबाबतची माहिती शिवानीच्या कुटुंबीयांना दिली. हे समजल्यानंतर काही काळ शिवानी आपल्या पती ओमकारच्या घरी राहत होती. त्यानंतर शिवानीचा मामा ओमकारच्या घरी आला आणि त्याने दोघांशी चर्चा केली. “तुम्ही घरच्यांच्या संमतीशिवाय पळून जाऊन लग्न केलं आहे. कोर्ट मॅरेजही (Court Marriage) केलं आहे. मात्र, आता आपण सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत विधिवत लग्न लावून देऊ,” असे आश्वासन त्याने दिल्याचे सांगण्यात आले आहे. कुटुंबियांचा विरोध संपल्याचे समजताच ओमकार आणि शिवानी दोघेही आनंदित झाले. मामांच्या शब्दांवर विश्वास ठेवून शिवानी पुन्हा आपल्या माहेरी परतली.

यानंतर दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. २४ मे रोजी त्यांचा विवाह सोहळा पार पडणार होता. त्यासाठी हॉलही बुक करण्यात आला होता. लग्नासाठी आवश्यक तयारीदेखील सुरू करण्यात आली होती. मात्र, लग्नाच्या आदल्या रात्रीच शिवानीचे कुटुंबीय तिला सोबत घेऊन अचानक निघून गेल्याचा प्रकार समोर आला. ही बाब लक्षात येताच ओमकारने शिवानीचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांकडे (Relatives), मित्रमंडळींकडे (Friends) आणि परिचितांकडे (Mutual Friends) चौकशी करण्यात आली. मात्र, शिवानीचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर ओमकारने डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाणे गाठत पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

तक्रारीमध्ये ओमकारने गंभीर आरोपही केले आहेत. “मी बौद्ध समाजाचा असल्यामुळे शिवानीच्या कुटुंबीयांच्या मनात माझ्याबद्दल नाराजी होती. त्यांनी यापूर्वी मोबाईल फोनवरून मला अपशब्दही वापरले होते. त्यामुळे शिवानीच्या सुरक्षिततेबाबत मला चिंता वाटत आहे. तिच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असून पोलिसांनी तातडीने तिचा शोध घ्यावा,” अशी मागणी त्याने केली आहे. दरम्यान, मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून तपास सुरू केला आहे. शिवानीचा शोध घेण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असून पोलिसांकडून पुढील चौकशी करण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >