Saturday, May 23, 2026

PBKS vs LSG : विजय मिळाला, टॉप ४ मध्ये पोहोचली पंजाब; तरीही बाहेर पडण्याचा धोका

PBKS vs LSG : विजय मिळाला, टॉप ४ मध्ये पोहोचली पंजाब; तरीही बाहेर पडण्याचा धोका
मुंबई : आयपीएलमध्ये (IPL) काल पंजाब किंग्जने (PBKS) लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) ७ विकेट्स राखून पराभव करत महत्त्वाचा विजय मिळवला. या विजयामुळे पंजाब किंग्जने गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली असली, तरी त्यांच्या प्लेऑफच्या (Playoff) आशांवर अद्यापही संकट कायम आहे. आगामी सामन्यांच्या निकालांवर पंजाबचे भवितव्य अवलंबून असणार आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सने २० षटकांत १९६ धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र पंजाब किंग्जने हे आव्हान यशस्वीरीत्या पार करत ७ विकेट्स (Wickets) राखून विजय मिळवला.
१९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. सलामीवीर प्रियांश आर्या शून्यावर बाद झाल्याने पंजाबला पहिल्याच धक्क्याचा सामना करावा लागला. त्यानंतर प्रभसिमरन सिंग आणि कूपर कॉनोली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कूपर कॉनोली चांगल्या लयीत दिसत असताना मोहम्मद शमीने त्याला १८ धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यामुळे पंजाबची अवस्था २ बाद अशी झाली होती. त्यानंतर प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. दोघांनी संयमी आणि आक्रमक फलंदाजीचा सुरेख मिलाफ साधत पंजाबला विजयाच्या दिशेने नेले. मात्र सामना संपवतील असे वाटत असतानाच अर्जुन तेंडुलकरने प्रभसिमरन सिंगला एलबीडब्ल्यू बाद केले. प्रभसिमरनने ६९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
प्रभसिमरन बाद झाल्यानंतरही कर्णधार श्रेयस अय्यर खंबीरपणे मैदानात उभा राहिला. त्याने शानदार शतक झळकावत नाबाद १०१ धावांची खेळी साकारली आणि पंजाबला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. श्रेयसच्या या दमदार खेळीमुळे पंजाबला दोन महत्त्वाचे गुण मिळाले. लखनऊ सुपर जायंट्सचे प्लेऑफमधील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले असल्याने या पराभवाचा त्यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही. मात्र पंजाबसाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा ठरला. या विजयानंतर पंजाब किंग्जचे १४ सामन्यांत १५ गुण झाले असून संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तथापि, पंजाबने विजय मिळवला असला तरी त्यांच्यावर अद्यापही प्लेऑफमधून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. कारण या सामन्याच्या निकालानंतर अवघ्या १७ तासांनी रविवारी वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात महत्त्वाचा सामना खेळवला जाणार आहे. जर राजस्थान रॉयल्सने हा सामना जिंकला, तर त्यांचे गुण १६ होतील आणि ते थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. अशा परिस्थितीत पंजाब किंग्जसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्यांना स्पर्धेबाहेर जावे लागू शकते. दुसरीकडे, जर मुंबई इंडियन्सने (MI) राजस्थान रॉयल्सचा (RR) पराभव केला, तर पंजाब किंग्जच्या प्लेऑफच्या आशा कायम राहतील आणि त्यांना मोठा दिलासा मिळेल.
याशिवाय कोलकाता नाईट रायडर्सकडेही अजून प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. कोलकाताने दिल्लीचा पराभव केल्यास त्यांचेही १५ गुण होतील. मात्र अशा परिस्थितीत पंजाब (PBKS) आणि कोलकाता (KKR) या दोन्ही संघांचे गुण समान असतील. त्यामुळे नेट रनरेट निर्णायक ठरणार आहे. कोलकाताला पंजाबला मागे टाकून चौथ्या स्थानावर झेप घ्यायची असेल, तर त्यांना दिल्लीविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. चांगल्या नेट रनरेटच्या जोरावर केकेआर (KKR) पंजाबला (PBKS) मागे टाकत प्लेऑफच्या शर्यतीत पुढे जाऊ शकते. त्यामुळे पंजाब किंग्जने लखनऊवर विजय मिळवला असला, तरी प्लेऑफचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजस्थान, मुंबई आणि कोलकाता यांच्या सामन्यांचे निकालच आता पंजाबचे भवितव्य ठरवणार आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >