मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाचा प्रवास असाच सुसाट राहिल्यास ५ जूनला गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ६ जूनला कोकणात आणि ७ जूनला पुण्यात पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. आता पाऊस महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भीषण उकाड्याने आणि वाढत्या तापमानाने हैराण झालेल्या नागरिकांसाठी पावसाच्या आगमनाची दिलासादायक अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, शनिवारी नैऋत्य मान्सूनने नैऋत्य अरबी समुद्र, आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन परिसर तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत यशस्वी प्रगती केली आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून आणखी वेगाने पुढे सरकण्यासाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. या आगामी काळात नैऋत्य व आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन क्षेत्र, बंगालच्या उपसागराचा आणखी मोठा भाग आणि उर्वरित अंदमान समुद्र मान्सूनच्या कक्षेत येण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
यंदा नैऋत्य मान्सून वेळेआधीच केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यत: १ जूनच्या सुमारास पोहोचणारा मान्सून यंदा २६ मे रोजीच केरळ किनारपट्टीवर धडकू शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने मान्सूनचा वेग वाढला आहे. विशेष म्हणजे, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात कोणताही मोठा अडथळा येणार नसून तो सुरळीत पुढे सरकणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.






