Thursday, May 21, 2026

Sindhudurg News : समुद्रात उतरण्याआधी आईशी झाला शेवटचा संवाद; तारकर्लीत पुण्याचा तरुण बुडून बेपत्ता

Sindhudurg News : समुद्रात उतरण्याआधी आईशी झाला शेवटचा संवाद; तारकर्लीत पुण्याचा तरुण बुडून बेपत्ता

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली एमटीडीसीसमोरील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पुण्यातील दोन पर्यटकांपैकी एक तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाला. ही हृदयद्रावक घटना काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता समुद्रात उड्या मारत एका तरुणाला सुखरूप बाहेर काढले, मात्र दुसरा तरुण लाटांच्या तडाख्यात खोल समुद्रात वाहून गेला.

समर्थ गणेश कर्पे (वय २२, रा. आंबेगाव, पुणे) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव असून ऋषभ रविकिरण कदम याला स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात आले. सध्या त्याच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ कर्पे आणि ऋषभ कदम हे दोघेही पुण्यातील ‘रेवती एन्टरप्रायजेस’मध्ये कार्यरत होते. १९ मे रोजी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. समाजकल्याण विभागाशी संबंधित कार्यालयीन काम पूर्ण केल्यानंतर त्यांनी मालवणमध्ये पर्यटनासाठी थांबण्याचा निर्णय घेतला होता.

दुपारच्या सुमारास दोघेही तारकर्ली येथील एमटीडीसी रिसॉर्टसमोरील समुद्रात आंघोळीसाठी उतरले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र काही वेळातच समुद्रातील पाण्याचा वेग आणि वाढत्या लाटांचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्याकडे ओढले जाऊ लागले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी जोरदार आरडाओरडा सुरू केला.

किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचा आवाज ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता समुद्रात उड्या मारल्या. संकेत तारी, दत्तराज चव्हाण, वैभव खोबरेकर, महेंद्र चव्हाण आणि वैभव सावंत या ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर त्यांनी ऋषभ कदम याला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र समर्थ कर्पे हा प्रचंड वेगाने येणाऱ्या लाटांमध्ये अडकला आणि खोल समुद्रात वाहून गेला.

दरम्यान, ऋषभची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची गरज होती. यासाठी ‘१०८’ रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला होता. मात्र तब्बल अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही. अखेर वेळ न दवडता स्थानिकांनीच पुढाकार घेत ऋषभला दुचाकीवरून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या संपूर्ण घटनेतील सर्वाधिक हळवी आणि मन सुन्न करणारी बाब म्हणजे, समुद्रात उतरण्यापूर्वी समर्थ कर्पे याचा त्याच्या आईसोबत झालेला शेवटचा संवाद. समुद्रकिनारी असताना ऋषभच्या मोबाईलवर समर्थच्या आईचा फोन आला होता. ऋषभने तो फोन समर्थकडे दिला. समर्थने आईशी काही वेळ निवांत संवाद साधला, त्यानंतर फोन ठेवला आणि पुन्हा समुद्रात उतरला. मात्र काही क्षणांतच ही दुर्दैवी घटना घडली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा