Friday, May 15, 2026

Virat Kohil : विराट कोहलीचा बीसीसीआयला स्पष्ट संदेश; मला स्वतःला सिद्ध करावे लागणार असेल तर…..

Virat Kohil : विराट कोहलीचा बीसीसीआयला स्पष्ट संदेश; मला स्वतःला सिद्ध करावे लागणार असेल तर…..

The RCB Podcast - Life in Cricket : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्यास तयार आहे. पण त्याला संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयकडून विश्वास आणि सन्मानाच्या वागणुकची अपेक्षा आहे. भारतीय संघासाठी माझ्याकडून जे जे चांगले करणे शक्य आहे त्यासाठी मी तयार असल्याचे कोहली म्हणाला.

मी खेळेन, पण मला वारंवार माझी योग्यता सिद्ध करावी लागणार असेल तर खेळणे मला योग्य वाटत नाही. कोहलीच्या या वक्तव्याकडे अनेकजण बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाला दिलेला थेट इशारा म्हणून पाहत आहेत. कोहलीने अलीकडेच देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली. दोन सामन्यांत त्याने २०८ धावा करत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. या कामगिरीबाबत बोलताना कोहली म्हणाला की, मी ही स्पर्धा कोणाला काही सिद्ध करण्यासाठी खेळलो नाही. मी खेळलो कारण माझे क्रिकेटवर प्रेम आहे.

सध्या कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ एकदिवसीय प्रकारात सक्रिय आहे. त्याने यापूर्वी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. २०२७ च्या विश्वचषकाबाबत बोलताना कोहली म्हणाला की, भारतासाठी विश्वचषक खेळणे ही मोठी गोष्ट आहे; मात्र त्यासाठी दोन्ही बाजूंनी स्पष्टता आणि विश्वास असणे गरजेचे आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीने आतापर्यंत ३११ सामन्यांत १४,७९७ धावा केल्या असून त्यात ५४ शतके आणि ७७ अर्धशतकांचा समावेश आहे.

नेमके प्रकरण काय?

गेल्या वर्षी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अचानक एकत्र कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर भारतीय संघात सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. सध्या दोघेही भारतासाठी केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत.२०२७ च्या विश्वचषकात त्यांच्या सहभागाबाबत अनिश्चितता असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. काही अहवालांनुसार मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशी मतभेद असल्याचीही चर्चा आहे. मात्र या तिघांपैकी कोणीही याबाबत अधिकृतपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा याला कर्णधारपदावरून दूर करण्यात आल्याची चर्चा देखील झाली होती. तसेच बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनीही या दोघांच्या भवितव्याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. मात्र कोहलीने केलेल्या विधानाने टीम इंडियामध्ये काही बरोबर नसल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment