Saturday, June 6, 2026

IND vs AFG : गिल-राहुलच्या शतकांनी अफगाणिस्तानवर भारताची पकड मजबूत;पहिल्याच दिवशी 368/3

IND vs AFG : गिल-राहुलच्या शतकांनी अफगाणिस्तानवर भारताची पकड मजबूत;पहिल्याच दिवशी 368/3

न्यू चंदीगड : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर टीम इंडियाचेच वर्चस्व दिसले. नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी फलंदाज केएल राहुल यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने दिवसअखेर 3 विकेट्स गमावत 368 धावांचा डोंगर उभारला आहे. अफगाणिस्तानचे गोलंदाज पहिल्या दिवशी भारताला रोखण्यात पुरते अपयशी ठरले.

भारतीय संघाची फलंदाजी

भारतीय फलंदाजीची सुरुवात केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी केली.दोघांनी सावध पण सकारात्मक फलंदाजी करत संघाला भक्कम पाया रचून दिला. मात्र यशस्वी 24 धावांवर बाद झाला. त्यानंतर राहुल आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. सुदर्शनने 81 धावांची खेळी केली,पण शतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना तो मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला.त्यानंतर दुसऱ्या बाजूने केएल राहुलने संयमी आणि दर्जेदार फलंदाजी करत शानदार शतक पूर्ण केले. राहुल 100 धावांवर बाद झाला, मात्र त्याने भारताला मजबूत स्थितीत पोहोचवले होते. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलने जबाबदारी स्वीकारत आपल्या होम ग्राऊंडवर दमदार शतक झळकावले. ऋषभ पंतनेही आक्रमक अर्धशतक करत भारताची धावगती कायम ठेवली.

पहिल्या दिवशी भारताकडून केएल राहुलने १६५ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या, तर साईने ८१ धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलने दमदार शतक झळकावत आपला आयपीएलमधील दमदार फॉर्म कायम ठेवला. ऋषभ पंतने ७० चेंडूंमध्ये ५० धावांची स्फोटक खेळी करत आपल्या खराब आयपीएल कामगिरीवर मात केली. शुभमन गिल आणि ऋषभ पंत दोघेही पहिल्या दिवशी नाबाद राहिले. अफगाणिस्तानकडून सलीम साफीने दोन बळी घेतले, तर झियाउर रहमान शरीफीने राहुलला बाद केले. मात्र, अफगाण गोलंदाजांना भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी संघर्ष करावा लागला.

राहुलसोबत नेमके घडले काय ?

राहुलच्या डावादरम्यान एक मोठा वादही पाहायला मिळाला. शरीफीच्या गोलंदाजीवर राहुलच्या बॅटची कड घेत चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला होता.अफगाण खेळाडूंनी जोरदार अपील केले,मात्र पंचांनी नाबाद दिले.कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने डीआरएस घेतला नाही.नंतर रिप्लेमध्ये राहुल बाद असल्याचे स्पष्ट दिसून आले आणि अफगाणिस्तानने मोठी संधी गमावल्याचे समोर आले.दुसऱ्या दिवशी भारत मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार हे निश्चित.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >