Friday, May 15, 2026

Indian Musician Death : भारतीय शास्त्रीय संगीतविश्वाला मोठा धक्का! ज्येष्ठ तबला वादक उस्ताद साबिर खान यांचं निधन

Indian Musician Death : भारतीय शास्त्रीय संगीतविश्वाला मोठा धक्का! ज्येष्ठ तबला वादक उस्ताद साबिर खान यांचं निधन

कोलकाता : भारतीय शास्त्रीय संगीतविश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी. प्रख्यात तबला वादक उस्ताद साबिर खान यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. संगीतप्रेमी आणि कलाकारांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुलं असा परिवार आहे.

उस्ताद साबिर खान हे फर्रुखाबाद घराण्याचे प्रमुख आणि अत्यंत मानाचे तबला वादक म्हणून ओळखले जात होते. तबल्याच्या दुनियेत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या तबल्याच्या ठेक्यांमध्ये परंपरा, शिस्त, सौंदर्य आणि भावनांचा अनोखा संगम अनुभवायला मिळत असे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वादनशैलीमुळे त्यांनी देश-विदेशातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.

४ डिसेंबर १९५९ रोजी उत्तर प्रदेशातील रामपूर येथे त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांना संगीताचे संस्कार लाभले होते. त्यांचे आजोबा उस्ताद मसित खान आणि वडील उस्ताद करामतुल्ला खान यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तबल्याचे धडे गिरवले. लहान वयातच त्यांनी तबल्यामध्ये प्राविण्य मिळवत संगीतविश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

उस्ताद साबिर खान यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत रंगमंच गाजवला. उस्ताद अमजद अली खान, पंडित रविशंकर, उस्ताद बिस्मिल्ला खान, पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि विदुषी गिरिजा देवी यांसारख्या महान कलाकारांसोबत त्यांनी अनेक संस्मरणीय मैफिली सादर केल्या होत्या. त्यांच्या वादनाने भारतीय शास्त्रीय संगीताला नवी उंची मिळाली होती.

संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. मात्र, कलाकार म्हणूनच नव्हे तर गुरु म्हणूनही त्यांनी मोठे कार्य केले. ‘उस्ताद करामतुल्ला खान म्युझिक सोसायटी’च्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नवोदित कलाकार घडले.

उस्ताद साबिर खान यांच्या निधनामुळे भारतीय शास्त्रीय संगीताच्या एका सुवर्ण पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या तबल्याचे ठेके, त्यांची साधना आणि संगीतासाठीचे योगदान कायम रसिकांच्या स्मरणात राहणार हे नक्की.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >