Saturday, May 9, 2026

Sindhudurg : सिंधुदुर्गात अवकाळीचे तांडव, ४१ घरांची पडझड, लाखोंचे नुकसान

Sindhudurg : सिंधुदुर्गात अवकाळीचे तांडव, ४१ घरांची पडझड, लाखोंचे नुकसान

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटांसह सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आणि वादळी पावसामुळे कणकवली बाजारपेठेसह जिल्ह्याच्या अनेक भागांना मोठा फटका बसला आहे. या वादळामुळे अनेक ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कणकवली बाजारपेठेतील महापुरुष कॉम्प्लेक्सजवळ असलेल्या महापुरुष देवस्थान परिसरातील एका जुन्या पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी मोडून मुख्य रस्त्यावर कोसळली. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने बाजारपेठेतील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही या वादळाचे सावट पाहायला मिळाले. हळवल-कळसुली मार्गावर शिरवळ दरम्यान रस्त्यावर झाड कोसळल्याने त्या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती. नागवे येथील पटेलवाडीमध्ये सचिन सावंत यांच्या राहत्या घरावर आंब्याच्या झाडाची मोठी फांदी कोसळून घराचे नुकसान झाले. या सर्व घटनांची माहिती मिळताच नगरपंचायत प्रशासनाने तातडीने हालचाली करत घटनास्थळी धाव घेतली. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला हटवली आणि वाहतूक सुरळीत केली.

शनिवारी झालेल्या या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका महावितरण विभागाला बसला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत विद्युत वाहिन्यांवर झाडे आणि फांद्या पडल्याने वीज वाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अनेक गावांना अंधाराचा सामना करावा लागला. महावितरणचे कर्मचारी पावसातही वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील होते. जिल्ह्याच्या काही भागांत या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकांचेही नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वैभववाडीत ४१ घरांची पडझड, सातबारा नसल्याने नुकसानभरपाईत अडचणी : वैभववाडीत शनिवारी जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली होती. तालुक्यातील काही भागांत चक्रीवादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. आखवणे, भोम पुनर्वसन गावठाणाला या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. गेल्या दोन दिवसांत ४१ घरांची छपरे उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, तर मांगवली, तिथवली, करूळ, वेंगसर परिसरातही अनेक घरांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे मोडून पडल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वीज वाहिन्यांवर झाडे पडल्यामुळे काही गावात वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू होते. पुनर्वसन गावठाण परिसरातील भूखंडांलगत लावण्यात आलेली आंबा व काजूची झाडेही वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडली असून धरणग्रस्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुनर्वसन गावठाणातील अनेक धरणग्रस्तांनी रिकाम्या भूखंडांमध्ये आंबा, काजू आदी फळझाडांची लागवड केली आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे ही झाडे जमीनदोस्त झाली आहेत. संबंधित भूखंडांचे सातबारा अद्याप धरणग्रस्तांच्या नावावर नसल्याने फळझाडांच्या नुकसानभरपाईसाठी तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

रोह्यासह परिसरात धुळीचे लोट : रोह्यासह आजूबाजूच्या परिसरात अचानक आलेल्या धुळीच्या वादळाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, रस्त्यावरील जाहिरातींचे मोठे होर्डिंग्जही हवेत उडाले. या नैसर्गिक आपत्तीत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. दुपारच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले आणि जोरदार वाऱ्यासह धुळीचे लोट वाहू लागले. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांची आणि स्थानिकांची मोठी धावपळ झाली. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. तसेच, अनेक व्यावसायिकांचे आणि सार्वजनिक ठिकाणचे होर्डिंग्ज फाटून खाली पडले आहेत. वादळामुळे परिसरात सध्या भीतीचे वातावरण आहे. हवामानातील या बदलामुळे येत्या काही तासांत पुन्हा वादळ किंवा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. झाडाखाली किंवा कमकुवत इमारतींजवळ उभे न राहता सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment