संभव इंगोले
Nitesh Rane Birthday : आज, २३ जून २०२६, महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस. सोशल मीडियावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव झाला. ट्विटरवर त्यांच्या नावाचा हॅशटॅग ट्रेंड झाला, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हजारो पोस्ट आल्या. पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी या सगळ्यांनी आपल्या परीने हा दिवस विशेष बनवण्याचा प्रयत्न केला.
मुंबईतील कलानगर परिसरापासून ते कोकणातील छोट्या गावांपर्यंत बॅनर झळकले, शुभेच्छा संदेश पाठवले गेले. 'हिंदू गब्बर' अशी ओळख असलेल्या नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री बाहेरही बॅनरबाजी झाली, ज्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले.
जनतेचे दुःख हीच माझी पहिली प्राथमिकता
मात्र या सगळ्या शुभेच्छांच्या गजबजाटात एक गोष्ट वेगळी उठून दिसली. मंत्री नितेश राणे यांनी स्वतःच यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आधीच जाहीर केला होता. कोकणातील आंबा आणि काजू पिकांचे झालेले नुकसान, लांबलेल्या पावसाळ्यामुळे मच्छीमार बांधवांची झालेली परवड आणि एल-निनोच्या सावटामुळे राज्यभर निर्माण झालेली पाणीटंचाई या पार्श्वभूमीवर त्यांनी हा संवेदनशील निर्णय घेतला.
जनतेच्या दुःखात सहभागी होणे आणि सेवाभावातून समाजकार्यात योगदान देणे हीच माझ्यासाठी सर्वात मोठी वाढदिवसाची भेट असेल, असे राणे यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले. राज्यातील शेतकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य नागरिक संकटांचा सामना करत असताना वाढदिवस साजरा करण्यापेक्षा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांना आवाहन
मंत्री राणे यांनी सर्व हितचिंतक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांना वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटीसाठी येऊ नये असे सूचित केले होते . तसेच प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यात आणि परिसरात समाजोपयोगी उपक्रम राबवून गरजूंना मदतीचा हात द्यावा असे आवाहन केले. विशेषतः गो-सेवा, गोशाळांना मदत, रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहिमा आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.तुमचा सेवाभाव हीच माझ्यासाठी लाखमोलाची सदिच्छा असेल, असे सांगत त्यांनी आपल्या संदेशाचा शेवट 'जय श्री राम!' या घोषणेने केला.
कार्यकर्त्यांनी जपला आदेश
राणे यांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देवगडात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीम राबवली. नदीपात्रातील काचेच्या बाटल्या, सिरिंज व वैद्यकीय कचरा गोळा करून त्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्यात आली. गरीब आणि गरजू घटकांना मदत करणे, पर्यावरण संवर्धन यांसारखे उपक्रम राज्यभर राबवले गेले.सोशल मीडियावर मात्र शुभेच्छांना बांध राहिला नाही. सिंधुदुर्गातील सरपंचांपासून ते राज्यस्तरीय नेत्यांपर्यंत प्रत्येकाने आपल्या शब्दांत 'कोकणचे कार्यसम्राट' आणि 'युवा नेतृत्व' यांना शुभेच्छा दिल्या.
लोकनेत्याचे खरे रूप
नितेश राणे यांचा हा निर्णय केवळ वाढदिवस न साजरा करण्याचा नव्हता. तो एका लोकप्रतिनिधीच्या संवेदनशीलतेचा, जबाबदारीचा आणि जनतेशी असलेल्या नात्याचा प्रत्यय होता. सत्तेच्या शिखरावर असतानाही जनतेचे दुःख आपले मानणे, हेच खऱ्या नेतृत्वाचे लक्षण आहे.शुभेच्छांचा वर्षाव झाला, पण उत्सव झाला जनसेवेचा. हाच नितेश राणे यांच्या वाढदिवसाचा खरा संदेश ठरला.
View this post on Instagram






