Wednesday, June 24, 2026

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधतेने नटलेल्या आणि 'ॲमेझॉन ऑफ इंडिया' ('Amazon of India') म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिलारी खोऱ्यात (ता. दोडामार्ग) भव्य राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. "जामनगरमधील 'वनतारा' प्रकल्पाच्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात ५० टक्के प्राण्यांचे पुनर्वसन आणि ५० टक्के सफारी अशा स्वरूपाचे राष्ट्रीय उद्यान निर्माण करावे आणि या उद्यानाला देशाचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे," अशी आग्रही मागणी भाजप आमदार प्रमोद जठार यांनी बुधवारी विधानपरिषदेत केली. या मागणीला वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, "संबंधित क्षेत्राची ड्रोन फोटोग्राफी आणि माहिती मिळताच अधिकारी पाठवून या जागेची पाहणी केली जाईल आणि या प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा सरकार करेल," अशी ग्वाही सभागृहात दिली. MLA Pramod Jathar

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या नामकरणाच्या चर्चेदरम्यान आमदार जठार यांनी कोकणातील संधींकडे वनविभागाचे लक्ष वेधले. जठार म्हणाले, "महाराष्ट्रात केवळ मुंबईतच एकच राष्ट्रीय उद्यान का असावे? वन खात्याच्या ताब्यात असलेल्या इतर समृद्ध जमिनींवरही अशी उद्याने का निर्माण होऊ नयेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुका आणि तिलारी खोरं हे खऱ्या अर्थाने 'ॲमेझॉन ऑफ इंडिया' आहे. तुम्ही अगदी गुगल किंवा चॅट जीपीटीला विचारले, तरी हिंदुस्थानातील ॲमेझॉन म्हणून याच क्षेत्राचे नाव समोर येईल. इथे हजारो एकर क्षेत्र हे आधीच 'टायगर फॉरेस्ट' म्हणून घोषित आहे. या ठिकाणी सिंह सोडला तर निसर्गातील सर्व वन्यप्राणी उपलब्ध आहेत आणि शेजारील राज्यातून हत्ती तर थेट चालून येतात."

गुजरातच्या कोरड्या भागात जर हजारो एकरवर प्राण्यांच्या संगोपनासाठी 'वनतारा' उभा राहू शकतो, तर मुबलक निसर्ग लाभलेल्या दोडामार्गमध्ये ३ ते ४ हजार एकर जागेवर राष्ट्रीय उद्यान का बनू शकत नाही? गोव्यात मोपा विमानतळ झाल्यामुळे या भागात पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला आहे. जर वनविभागाने येथे वन्यजीव सफारी आणि राष्ट्रीय उद्यान उभारले, तर महाराष्ट्राच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल", असे जठार म्हणाले.

वनमंत्री गणेश नाईक सकारात्मक

आमदार प्रमोद जठार यांच्या या मागणीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले "जठार यांनी मांडलेला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी सुचवलेल्या तिलारी खोऱ्यातील क्षेत्राची ड्रोनच्या साहाय्याने केलेली फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी वनविभागाला तात्काळ पाठवून द्यावी. आमचे विभागीय वन अधिकारी (डीएफओ) उद्याच राणे साहेबांशी किंवा संबंधित आमदारांशी संपर्क साधतील. ते क्षेत्र निश्चित झाल्यानंतर दिवंगत पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव त्या उद्यानाला देण्याची अधिकृत घोषणा सरकारकडून तातडीने केली जाईल", अशी ग्वाही त्यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा