मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप जलाशय टेकडी येथील डोंगराळ भागात काही समाजकंटकांनी बेकायदेशीररित्या गांजाची शेती केली जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. भाजपाच्या स्थानिक नगरसेविका जागृती पाटील यांनी पोलिसांसमवेत या जागेची पाहणी करून ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.
भांडुप जलाशय टेकडीवरील डोंगरावर दुर्मिळ जागी काही समाजकंटक गांजाची शेती करत असल्याची माहिती मिळताच भाजपा नगरसेविका जागृती पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित भांडुप पोलीस ठाण्यास कळवले. भांडुप पोलिसांनी या माहितीची तातडीने दखल घेत घटनास्थळी पाहणी करून शेतीची माहिती घेतली. यामध्ये ही शेती गांजाचीच असल्याचे दिसून आले. त्यामुळे डोंगर भागात लागवड केलेली ही गांजाची झाडे पूर्णपणे नष्ट केली. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या परिसरात अशा प्रकारची कोणतीही बेकायदेशीर कृत्ये निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा,असे आवाहन असे नगरसेविका जागृती पाटील यांनी केले आहे.






