Vivek Agnihotri's first reaction after Mamata Banerjee's defeat : ‘आता भीतीशिवाय जगा’; ममता बॅनर्जींच्या पराभवानंतर दिगदर्शक विवेक अग्निहोत्रींची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : ममता बॅनर्जी यांच्या पराभवामुळे बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. सर्वत्र भाजपच्या ऐतिहासिक विजयाचा आणि ममता बॅनर्जींच्या पराभवाचा जल्लोष साजरा होत आहे. याच जल्लोषात आता प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री देखील मागे नाहीत. बंगालमधील भाजपच्या विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देत विवेक अग्निहोत्री यांनी "आता भीतीशिवाय जगा" असं म्हंटल आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आहे.


नेमकं काय म्हणाले विवेक अग्निहोत्री ?


इन्स्टाग्राम पोस्टमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं की, “पुन्हा कधीच नाही. अनेकांना माहिती नाही, पण 'द कश्मीर फाइल्स' प्रदर्शित झाल्यानंतर मला बंगालमध्ये अडवण्यात आलं. माझा चित्रपट सिनेमागृहांतून काढून टाकण्यात आला आणि मला राज्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.







ते पुढे म्हणाले की, “गेल्या वर्षी 'द बंगाल फाइल्स'ला देखील पश्चिम बंगालमध्ये अनेक अडथळे आले. आमचा ट्रेलर लॉन्च होऊ दिला गेला नाही. आमच्यावर हल्ले झाले, मारहाण करण्यात आली. माझ्याविरोधात अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आणि माझ्यावर राज्यात बहिष्कार टाकण्यात आला. इतकंच नव्हे, तर मला राज्यपालांकडून पुरस्कार स्वीकारण्यासाठीही जाता आलं नाही,” असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं.


या सगळ्या घटनांचा उल्लेख करत विवेक अग्निहोत्री यांनी “सिर उठाकर चलो...” असं म्हणत आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की, निवडणुकीपूर्वी त्यांनी 'द बंगाल फाइल्स'अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. “आम्ही कधीच हार मानली नाही. गुप्तपणे हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवला. आमचा लढा सुरूच ठेवला आणि अखेर हा अभूतपूर्व विजय मिळाला. बंगालच्या जनतेचं अभिनंदन. आता तुम्ही भीतीशिवाय जगू शकता,” असंही त्यांनी म्हटलं.



दरम्यान, 'द बंगाल फाइल्स' या चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये अधिकृत बंदी घालण्यात आलेली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, अनेक सिनेमागृह मालकांनी परस्पर सहमतीने हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामागील कारणांबाबत कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नव्हती.


'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट अभिषेक अग्रवाल आर्ट्स आणि आयएम बुद्धा प्रोडक्शन्स यांच्या निर्मितीत तयार झाला आहे. १९४०च्या दशकातील बंगालमधील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, विशेषतः 'कलकत्ता हत्याकांडा'च्या दरम्यान झालेल्या हिंसाचारावर हा सिनेमा आधारित आहे. त्या काळातील अस्थिरता, विचारसरणीतील संघर्ष आणि अस्तित्वासाठीची झुंज यांचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत